क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हलवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवासह भारताचा विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला आहे. २७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ७ गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने कडवी झुंज दिली. अखेरच्या चेंडूपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या सामन्यात भारताचा पराभव झाला. या पराभवामुळे भारताचं उपांत्य सामन्या पोहोचण्याचं स्वप्न भंगलं.
भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात २७४ धावा करत आफ्रिकेला २७५ धावांचं लक्ष्य ठेवलं. भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात खराब झाली. हरमनप्रीत कौरने सलामीची फलंदाज लिझेल ली हिला धावचित केलं. त्यानंतर लॉरा वॉल्व्हार्ट आणि लारा लारा गुडॉल या दोघींनी शतकी भागीदारी करुन संघाला सावरलं. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. दोघींच्या भागिदारीने सामना भारताच्या हातातून निसटतोय असं वाटत असताना राजेश्वरी गायकावडनं ही जोडी फोडत सामन्यात रंगत आणली. त्यापाठोपाठ लॉराही ८० धावांवर बाद झाली आणि सामना भारतीय संघाच्या बाजूनं झुकला. पण अखेरच्या क्षणी सामना पुन्हा आफ्रिकेच्या बाजूनं झुकला. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता. दिप्ती शर्मानं अखेरच्या षटकात चांगली गोलंदाजी केली. पण अखेरच्या चेंडूवर ३ धावांची गरज असताना तिने नो बॉल टाकला आणि मॅच आफ्रिकेच्या बाजूनं फिरली. शेवटच्या बॉलपर्यंत या मॅचचा थरार पाहायला मिळाला. अखेर चुरशीच्या लढतीत आफ्रिकेनं बाजी मारली.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाकडून स्मृती मानधना, शेफाली वर्मा आणि कर्णधार मिथाली राज यांनी अर्धशतके केली आहेत. या तिघींच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने २७४ धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत
भारताच्या पराभवानंतर कोणता संघ उपांत्य फेरीत पोहोचला हे निश्चित झालं. भारताच्या पराभवाने वेस्टइंडीजने उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर दुसरीकडे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेचे संघ याआधीच उपांत्य फेरीत पोहोचले होते. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना वेस्टइंडीज सोबत होणार आहे. तर आफ्रिकेची लढत इंग्लंडसोबत होणार आहे.