कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली (Virat Kohli) वेगळ्याच ऊर्जेने खेळतो. प्रत्येक कसोटी सामना जिंकण्याचा तो सर्वतोपरी प्रयत्न करतो. सध्याच्या काळात कसोटी क्रिकेट मागे पडत असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, कोहलीसारख्या ‘सुपरस्टार’ खेळाडूचे कसोटी क्रिकेटवर अजूनही इतके प्रेम असल्याचे पाहून खूप आनंद होतो, असे म्हणत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने भारतीय कर्णधाराचे कौतुक केले. कसोटी क्रिकेट माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे असल्याचे कोहली वारंवार सांगत असतो. परंतु, कोहली हे केवळ त्याच्या बोलण्यातून नाही, तर कृतीतूनही दाखवतो. कसोटीत तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने जिंकले आहेत.
कोहली कसोटीला प्राधान्य देत असल्याचा आनंद
मी विराट कोहलीला जवळून ओळखतो. महान खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेवण्याला तो खूप महत्त्व देतो. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि अन्य महान क्रिकेटपटू हे कोहलीचे आदर्श आहेत. या खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. महान खेळाडू म्हणून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी टी-२० क्रिकेटप्रमाणेच कसोटीत यशस्वी ठरणे गरजेचे असल्याचे कोहलीला ठाऊक आहे. त्यामुळेच तो कसोटी क्रिकेटला इतके महत्त्व देतो. सध्या कसोटी क्रिकेटवर प्रेम असणाऱ्या खेळाडूंची खूप गरज आहे. या परिस्थितीत कोहलीसारखा सुपरस्टार खेळाडू पुढे येत कसोटी क्रिकेटला प्राधान्य देत असल्याचे पाहून आनंद होतो, असे पीटरसन म्हणाला.
कसोटीत वेगळ्याच ऊर्जेने खेळतो
कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही खेळपट्टीवर विजय मिळवू शकेल, असा संघ कोहलीला तयार करायचा आहे. यात त्याला यशही आले आहे. भारताने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. त्यानंतर भारताने लॉर्ड्सवर विजय मिळवल्याचा कोहलीला नक्कीच खूप आनंद असेल. तो खूप उत्साहाने, वेगळ्याच ऊर्जेने कसोटी क्रिकेट खेळतो. कसोटी क्रिकेट म्हणजे त्याच्यासाठी सर्वकाही आहे. कसोटीतील मोठ्या विजयांमुळेच तो क्रिकेट इतिहासात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करेल, असेही पीटरसनने नमूद केले.
हेही वाचा – सिबले आऊट, मलान इन; तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर