भारतीय संघाने यावर्षाच्या सुरुवातीला सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारतीय संघ या मालिकेत ०-१ असा पिछाडीवर पडला होता. त्यातच कर्णधार विराट कोहली वैयक्तिक कारणांनी मायदेशी परतला, बऱ्याच प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्या. मात्र, या सर्व आव्हानांवर मात करत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने चार सामन्यांची ही कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. परंतु, भारताने नको त्या गोष्टींना महत्व देत आमचे लक्ष विचलित केले. त्यामुळेच आम्ही कसोटी मालिका गमावल्याचा आरोप आता ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने केला आहे.
आमचा संघ गोंधळला
नको त्या गोष्टींना महत्व देत तुमचे लक्ष विचलित करण्यात भारतीय संघाचा हात कोणीही धरू शकत नाही. आम्हाला कसोटी मालिकेत हे बरेचदा प्रकर्षाने जाणवले. तुम्हाला मी याचे उदाहरणही देऊ शकतो. अखेरचा कसोटी सामना गॅबा येथे खेळता येणार नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे आमचा संघ नक्की सामना कुठे होणार या विचाराने थोडा गोंधळात पडला होता. भारतीय संघ अनावश्यक गोष्टींना महत्व देण्यात पटाईत आहे. त्यामुळे आमचे लक्ष विचलित झाले, असे पेन म्हणाला.
ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला शह
खेळाडूंना सक्तीचे क्वारंटाईन असल्यास गॅबा येथे अखेरचा कसोटी सामना खेळण्यास भारताने नकार दिल्याचे म्हटले जात होते. परंतु, बीसीसीआयकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण आले नव्हते. हा सामना गॅबा येथेच झाला. भारताने या मैदानावरील ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला शह देत ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग करत हा सामना जिंकला आणि कसोटी मालिकाही २-१ अशी खिशात घातली.