गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेची चांगली सुरुवात केली आहे. मुंबईला तीन पैकी दोन सामने जिंकण्यात यश आले. मुंबईला सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पराभूत केले. त्यानंतर मात्र मुंबईने कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यावर सलग दोन विजय मिळवले. मुंबईच्या या यशात अष्टपैलू हार्दिक पांड्याला अजून फारसे योगदान देता आलेले नाही. त्यातच त्याने एकाही सामन्यात गोलंदाजी केली नाही. मात्र, आयपीएलच्या आधी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने गोलंदाजी केली होती. त्यामुळे हार्दिक आयपीएलमध्ये नक्की का गोलंदाजी करत नाही? असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. अखेर मुंबईचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
गोलंदाजी करेल अशी आशा
हार्दिकने मागील मोसमात गोलंदाजी केली नव्हती. मात्र, यंदा तो गोलंदाजी करेल अशी आम्हाला आशा आहे. त्याला दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो मैदानात परतला होता. त्यातच इंग्लंडविरुद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यात त्याचा खांदा दुखावला. त्याच्यावर आम्ही उपचार करत आहोत. त्यामुळे तो पहिल्या तीन सामन्यांत गोलंदाजी करू शकला नाही, असे जयवर्धने म्हणाला.
आणखी एक-दोन आठवडे उपचार
आम्हाला हार्दिकबाबत धोका पत्करायचा नाही. तो आमचा महत्वाचा खेळाडू असून गोलंदाजी करताना त्याला अडचण येता कामा नये, असे आम्हाला वाटते. आणखी एक-दोन आठवडे त्याच्या खांद्यावर उपचार केला जाईल आणि त्यानंतर तो गोलंदाजी करताना दिसू शकेल, असे जयवर्धनेने स्पष्ट केले.