भारताचा माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धूनं भारत आणि पाकिस्तानातील संबंध सुधारण्यासाठी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानदरम्यान क्रिकेट मॅच खेळण्याची सूचना केली आहे. सिद्धूनं पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या संसदेतील जावेदशी झालेल्या मुलाखतीमध्ये इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) आणि पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) च्या विजेत्यांमध्ये तीन मॅचेसची सिरीज करण्याची सूचना दिली आहे. इस्लामाबादचे पंतप्रधान इमरान खानच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर लाहोरला जाण्यापूर्वी सिद्धूनं ‘क्रिकेट पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांना एकत्र आणू शकतं. आयपीएल आणि पीएसएलच्या विजेत्या टीममध्ये मॅच खेळवणं हा चांगला विचार आहे,’ असं मत मांडलं आहे.
डीएस जोन्सनं सूचनेची ओढली री
पीएसएल चॅम्पियन इस्लामाबाद युनायटेडचे कोच डीएस जोन्सनंदेखील नवजोत सिंह सिद्धूच्या या सूचनेची री ओढली आहे. त्यानं या सूचनेचं समर्थन करत त्यांची टीम या आव्हानासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे. यावर्षी इस्लामाबाद युनायटेडनं पीएसएलचा अंतिम सामना जिंकला होता. इमरान खानच्या शपथविधी सोहळ्याला आमंत्रणानुसार, काँग्रेस सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंह सिद्धू वाघा सीमेवरून लाहोरला गेले आणि तिथे जाऊन पाकिस्तानच्या राजधानी इस्लामाबादमध्ये इमरानच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.
Well I know @IsbUnited are keen..
Do the @BCCI @IPL and @ChennaiIPL have the same interest? https://t.co/akwTjdy6lO— Dean Jones (@ProfDeano) August 22, 2018
सोहळ्याला केवळ सिद्धूची उपस्थिती
इमरान खानच्या शपथविधी सोहळ्याला सुनील गावस्कर आणि कपिल देव यांनाही आमंत्रण होतं. मात्र केवळ सिद्धूनंच उपस्थिती लावली होती. यावेळी पुढच्या ओळीत पाकिस्तानी सेना प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याबरोबर गळाभेट घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर बऱ्याच लोकांनी उलटसुलट प्रतिक्रिया देत सिद्धूला ट्रोल केलं होतं.