भारतीय संघाने आयसीसी टी-२० विश्वचषकातील अभियानाची विजयासोबत सांगता केली आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने नामिबियावर ९ गडी राखून मोठा विजय मिळवला. पण तरीदेखील भारतीय संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. हा विश्वचषक विराट कोहलीच्या कर्णधारपदातील शेवटचा टी-२० हंगाम होता. सोमवारी झालेल्या सामन्यानंतर विराट कोहली भारतीय संघाच्या टी-२० संघाचे नेतृत्व करणार नाही. सोबतच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा देखील प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपला आहे. कोहली आणि शास्त्रींच्या जोडीच्या नेतृत्वात भारतीय संघाला आयसीसीचा एकही किताब जिंकता आला नाही.
मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांनी भारतीय संघासोबत कित्येक विदेशी दौरे केले आहेत. पण भारतीय संघाला आयसीसीचा किताब जिंकण्यात मात्र अपयश आले. संघाला निरोप देताना त्यांच्या मनात याची खदखद नक्कीच असेल. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये कसोटी सामने जिंकून कमाल करणाऱ्या शास्त्रींना आयसीसीचा किताब जिंकण्यात मात्र अपयश आले.
हे दोन संघ भारतासाठी बनले घातक
कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक शास्त्री यांना आयसीसी किताबापासून दूर ठेवण्यात २ संघाचा मोठा हात आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड या जोडीने भारतीय संघाला आयसीसी किताब जिंकण्यापासून दूर ठेवले. २०१७ मध्ये कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहचला होता. त्यावेळी पाकिस्तानने भारतीय संघाचा अंतिम फेरीत पराभव करून भारतीय संघाला आयसीसीच्या किताबापासून दूर ठेवले होते. तर २०१९ मध्ये कोहली आणि शास्त्री या जोडीच्या नेतृत्वात भारतीय संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहचला होता. किताब जिंकण्यापासून दोन पाऊले दूर असणाऱ्या भारतीय संघाला न्यूझीलंडने पराभूत केले होते. यासोबतच कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला दुसऱ्यांदा आयसीसीचा किताब जिंकण्यापासून मुकावे लागले.
२०२१ मध्ये भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचला होता. कोहली आणि शास्त्रींच्या जोडीला इथेदेखील विजयाची अपेक्षा होती. पण न्यूझीलंडने पुन्हा एकदा भारतीय संघाच्या अपेक्षेवर पाणी टाकत सामन्यावर विजय मिळवून किताब आपल्या नावावर केला. तर २०२१ मधील विश्वचषकाच्या पहिल्या फेरीत पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन संघ आहेत ज्यांच्यासोबत झालेल्या पराभवानंतर भारत हंगामातून बाहेर गेला आहे.