पाकिस्तानची सध्याच्या घडीला भारतीय संघाशी तुलना होऊच शकत नाही. त्यामुळे आगामी टी-२० वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) या दोन संघांमधील सामन्यात भारताचे पारडे जड आहे, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केले. मात्र, पाकिस्तानला कमी लेखण्याची चूक भारताने करू नये, असेही गंभीर म्हणाला. यंदा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये टी-२० वर्ल्डकप पार पडणार आहे. या स्पर्धेची सुरुवात प्राथमिक फेरीने होईल. त्यानंतर ‘सुपर १२’ फेरीला सुरुवात होईल. या फेरीत भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध २४ ऑक्टोबरला होणार आहे.
कोणत्याही संघाला कमी लेखू नये
चाहत्यांना पाकिस्तानकडून खूप अपेक्षा आहेत. परंतु, सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या संघाची भारताशी तुलना होऊ शकत नाही. मात्र, टी-२० क्रिकेटमध्ये कोणताही संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. एखादा खेळाडू दमदार कामगिरी करत त्याच्या संघाला सामना जिंकवून देऊ शकतो. त्यामुळे क्रिकेटच्या या प्रकारात कोणत्याही संघाला कमी लेखता कामा नये, असे गंभीर म्हणाला. अफगाणिस्तानला कमी खेळण्याची चूक कोणीही करणार नाही. त्यांच्याकडे राशिद खानसारखा खेळाडू आहे आणि त्याच्या कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तान कोणत्याही संघाला पराभवाचा धक्का देऊ शकतो. पाकिस्तानबाबत हीच गोष्ट म्हणता येईल.
अफगाणिस्तान जेतेपदाचे दावेदार
यंदा टी-२० वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजसारख्या संघांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु, इतर संघांनी अफगाणिस्तानच्या कामगिरीवरही नजर ठेवली पाहिजे, असे गंभीरला वाटते. टी-२० वर्ल्डकप जिंकण्यासाठी दावेदारांची चर्चा करताना अफगाणिस्तानचे नाव घेतले जात नाही. परंतु, त्यांच्या कामगिरीवर नजर ठेवली पाहिजे. त्यांच्या संघात राशिद खान, मुजीब आणि मोहम्मद नबी यांसारखे खेळाडू आहेत, असे गंभीरने स्पष्ट केले.
हेही वाचा – वॉर्नर, स्मिथचे कमबॅक; टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाचा मजबूत संघ