भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. परंतु, पहिल्या दिवशी चाहत्यांची हिरमोड झाली. सततचा पाऊस, ढगाळ वातावरण आणि मैदान ओले असल्याने पहिल्या दिवशी एकही चेंडू न टाकता खेळ रद्द करावा लागला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पावसाची शक्यता लक्षात घेऊन या अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवला होता. त्यामुळे आता या राखीव दिवसाचा वापर केला जाणार आहे. तसेच सामन्याचे पहिले चारही दिवस खेळ अर्धा तास लवकर सुरु होईल.
UPDATE – Unfortunately, play on Day 1 has been called off due to rains. 10.30 AM local time start tomorrow.#WTC21
— BCCI (@BCCI) June 18, 2021
‘दुर्दैवाने पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे,’ असे बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली. साऊथहॅम्पटन येथे मागील काही दिवस कडक ऊन आणि उष्ण वातावरण होते. त्यामुळे भारताने या सामन्यात दोन फिरकीपटू खेळवावे, असे मत भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले होते. परंतु, इंग्लंडमधील वातावरण हे सतत बदलत असते. त्यामुळे मागील काही दिवस कडक ऊन असले, तरी पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच हा अंतिम सामना असल्याने आयसीसीने धोका न पत्करता राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
हा सामना सुरु होण्यापूर्वीच रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर मुसळधार पाऊस आल्याने पहिल्या सत्रात खेळ होऊ शकला नव्हता. पाऊस थांबल्याने दुसऱ्या सत्रात खेळ होऊ शकेल अशी आशा होती. त्यातच भारताचे काही खेळाडू मैदानात उतरले होते. परंतु, पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.