उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. त्यापैकी चार राज्यांमध्ये भाजपने पुन्हा दमदार कामगिरी करत मोठा विजय मिळवला आहे. या निकालामुळे राज्यासह ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. शहरात ठीकठिकाणी लाडू वाटप करत नागरिकांचे तोंड गोड करून आनंद व्यक्त केला. भाजपच्या या विजयाने कार्यकर्त्यांना नवा उत्साह, नवी प्रेरणा मिळाल्याचे ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून दिसून आले.
ठाणे खोपट येथील भाजप विभागीय कार्यालयात ठाणे भाजपचे अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते जमा झाले आणि कार्यकर्त्यांनी ‘ये तो सिर्फ झलकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ अशा घोषणाही दिल्या. तसेच ठाणे स्टेशन परिसरात माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी लाडूचे वाटप केले. अशाप्रकारे ठीक ठिकाणी लाडू वाटप केले. दिव्यातही दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे आणि ज्योती पाटील यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी भाजपा दिवा शहर तर्फे लाडू वाटप केले.तसेच फटाक्यांच्या आतीषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
जिल्ह्यातील चारही महापालिकांमध्ये भाजपचा महापौर – निरंजन डावखरे
चार राज्यांमध्ये मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील चारही महापालिकांवर भाजपचे कमळ फुलणार असून सर्वत्र भाजपचे महापौर बसणार आहेत. असे विश्वास ठाणे जिल्हाध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला आहे.