ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभावरून स्थानिक पातळीवर भाजपा आणि शिवसेनेमध्ये वाद उफळताना, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांनी स्थानिक पातळी अशाप्रकारे एकमेकांना कोणीही कुरघोडी करणे अयोग्य असल्याचे मत सोमवारी ठाण्यात व्यक्त केले. तसेच मंत्रिमंडळातील समावेशाबाबत थेट बोलणे टाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आपण मागील तीस वर्षांपासून काम करत आहेत. ते दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व आहे. परिणामी ते दिलेला शब्द पाळतील असा आशावादही सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
ठाणे शहरातील नाले सफाई, रस्त्यांची सुरु असलेली कामे आदी प्रश्नाबाबत सोमवारी आमदार सरनाईक यांनी आयुक्त अभिजित बांगर यांची ठाणे महापालिका मुख्यालयात भेट घेतली. यावेळी सध्या ५० टक्के शहरात नालेसफाई झाली असल्याचे त्यांनी आयुक्ताच्या निदर्शनास आणून दिले. उरलेली नालेसफाई त्वरित करण्यात यावी अशी मागणीही आयुक्ताकडे केली. त्याचप्रमाणे शहरातील रस्त्यांची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आयुक्तानी दिली होती. पण आजही रस्त्यांची कामे सुरु आहेत. ती लवकर पूर्ण करावी ज्याने नागरिकांना वाहतूक त्रास होणार नाही.
त्याच जोडीला ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामाबाबत ही सरनाईक यांनी आयुक्ताशी यावेळी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, सरनाईकांनी भाजप ने ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. याबाबत त्यांना छेडले असता, मुळात २०१९ ला लोकसभा निवडणुकीत कल्याण आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. तेव्हा सेना भाजपा युतीचे मिळून ४२ खासदार राज्यातून लोकसभेत गेले होते. परिणामी याबाबत मी बोलणे उचित होणार नाही. यावर दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावर स्थानिक पातळीवर कोणीही कुरघोडी करणे अयोग्य असल्याचे मत सरनाईक यांनी व्यक्त केले. तर मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार विस्तार लवकरच होईल. पण राज्यात सध्या असलेले २० मंत्री हे उत्तम काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.