घरठाणेपालकमंत्री एकनाथ शिंदे हेच डोंबिवलीचे तारणहार

पालकमंत्री एकनाथ शिंदे हेच डोंबिवलीचे तारणहार

Subscribe

रविंद्र चव्हाण यांचे आरोप नैराश्यातून, शिवसेनेचा पलटवार

राज्याचे नगरविकास मंत्री तसेच ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीत १ हजार ६९० कोटींपेक्षा अधिक निधीचे विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे पालकमंत्री आणि खासदार हेच खर्‍या अर्थाने कल्याण डोंबिवलीच्या विकासाचे निर्माते आणि तारणहार आहेत. शिवसेनेने केलेली कामे दिसत असल्याने भाजप आमदार रविंद्र चव्हाण हे वैफल्यग्रस्त झाले असून त्यातूनच त्यांनी पालकमंत्र्यावर आरोप केल्याचा पलटवार शिवसेनेने केला आहे.

भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याच्या प्रत्युत्तरादाखल डोंबिवली शहर शिवसेनेतर्फे आज पत्रकार परिषद घेऊन जोरदार पलटवार केला. भाजप आमदार रविंद्र चव्हाण हे गटार पायवाटा करणारे आमदार आहेत. शहरातील विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी आमदार रविंद्र चव्हाण यांनी एकाच मंचावर येण्याचे खुले आव्हानही शिवसेनेकडून देण्यात आले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या २ वर्षांमध्ये सुमारे १ हजार ७०० कोटींचे प्रकल्प मंजूर केले आहेत. त्यामध्ये बाह्य वळण रस्ता , विविध उड्डाणपूल, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, भुयारी मार्ग आदी प्रकल्पांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

तेरा वर्षे आमदारकी आणि ३ वर्षे राज्यमंत्रीपदावर राहिलेल्या व्यक्तीला प्रशासकीय बाबी समजत नसतील तर यापेक्षा दुर्दैवाची बाब कोणती ? असा सवाल यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती दिपेश म्हात्रे यांनी उपस्थित केला. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारच्या शेवटच्या काळात आमदार चव्हाणांना डोंबिवलीच्या विकासाची आठवण झाली. त्यांनी ४७१ कोटीं रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्यांच्या कामाचा केवळ सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी न दिल्याने त्याच्या निविदा निघाल्या नाहीत. ज्या कामाला प्रशासकीय व वित्तीय मंजुरीच मिळाली नाही आणि निविदा देखील निघाल्या नाहीत त्या कामाचे कार्यादेश दिले जात नाही, ही साधी तांत्रिक बाब आमदार चव्हाणांना समजत नसल्यास त्यांनी अभ्यास करावा असा सल्ला दिपेश म्हात्रे यांनी दिला. त्यांनी एकाच मंचावर आमच्यासमोर येऊन विकासकामांची चर्चा करण्याचे खुले आव्हनही म्हात्रे यांनी यावेळी दिले.
कोवीड काळात कल्याण डोंबिवलीत दररोज हजारो रुग्ण सापडत होते.

त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हजारो बेडची अनेक सुसज्ज कोवीड उपचार केंद्र सुरू केली. कोरोना काळात दिवस रात्र लोकांसाठी काम करीत असताना पालकमंत्री आणि खासदार हे दोघेही दोन दोन वेळा कोवीडग्रस्त झाले. तरीही न डगमगता पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संकट काळात रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम केले. मात्र त्याचवेळी भाजप आमदार रविंद्र चव्हाण हे आपल्या गावातील फार्म हाऊसवर जाऊन राहिले होते. अशी खरमरीत टिका शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केली. तसेच एकीकडे पालकमंत्री आणि दुसरीकडे खासदार या दोघांनीही कल्याण डोंबिवलीत विकास कामाचा अक्षरशः धडाका लावला आहे. त्यातून आमदार चव्हाण हे वैफल्यग्रस्त झाले असून नैराश्यातून ते आता वाट्टेल ते बरळत आहेत. ज्यावेळी विरोधक सत्ताधार्‍यांवर टीका आणि आरोप करतात त्यावेळी सरकारचे काम व्यवस्थित सुरू आहे, असे समजावे असा टोलाही म्हात्रे यांनी यावेळी लगावला. या पत्रकार परिषदेला शिवसेना उप जिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहर प्रमूख राजेश मोरे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, दिपेश म्हात्रे, तात्या माने,विवेक खामकर, किशोर मानकामे, अभिजीत थरवळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -