घरठाणेठाण्यातील ‘कचर्‍याचे बेट’ पर्यटनासाठी खुले करा

ठाण्यातील ‘कचर्‍याचे बेट’ पर्यटनासाठी खुले करा

Subscribe

मालदीव, बाली आणि सिंगापूर येथे कचर्‍याच्या ढिगावर शास्रोक्तक पद्धतीने बेट तयार करून पर्यटकांसाठी आकर्षणाची केंद्रबिंदू बनवण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर ठाण्याच्या कापूरबावडी परिसरातील नाल्यात तब्बल 100 ते 150 मीटरपर्यंत कचर्‍याचे अनोखे बेट तयार झाले आहे. या बेटाचे लवकरच लोकार्पण करून ठाणेकरांसाठी ठाणे महापालिका प्रशासनाने नवीन पर्यटन केंद्र खुले करावे, अशी उपहासात्मक मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाने सोमवारी अनोख्या आंदोलनानंतर केली. यावेळी मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी नाल्यातील या कचर्‍याच्या बेटावर उतरून पालिका प्रशासनातील निद्रिस्त अधिकार्‍यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लवकरात लवकर येथील कचरा स्वच्छ न केल्यास हे कचर्‍याचे ढीग महापालिका अधिकार्‍यांच्या दालनाबाहेर नेऊन टाकले जातील असा इशाराही मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला.

ठाण्यातील गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा येथील वीस हजार नागरिकांना या नाल्यातील कचर्‍याच्या ढिगामुळे त्रास होतो. याठिकाणी कचरा साठून बेट तयार झाले आहे. याप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहराध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी पालिकेच्या वतीने या बेटाचे नामकरण करावे तसेच ठाण्यातील नागरिकांना कचर्‍याचे बेट बघण्याचा अनुभव उपलब्ध करून द्यावा, अशी बोचरी टीका आंदोलनानंतर केली. याप्रसंगी मनसेचे दत्ता चव्हाण, मीनल नवर, मनीष सावंत, हिरा पासी, कामिनी शेवाळे, अर्चना शिर्के, निलेश माळी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

पालिकेच्या धोरणालाच हरताळ
नवीन अर्थसंकल्पामध्ये पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वच्छ ठाणे या लेखा शीर्षक अंतर्गत ठाणे शहर कचरा मुक्त करण्यासाठी अंदाजे 85 कोटीचा निधी प्रस्तावित केला आहे. तसेच ठाण्यातील कचरा संकलित करण्यासाठी उभारण्यात आलेले सीपी तलाव येथे हस्तांतरण केंद्र अद्यावत करण्याच्या अनुषंगाने 23 कोटीचा निधी प्रस्तावित केला आहे. पालिकेच्या वतीने वर्षाला करोडो रुपये फक्त घनकचरा विभागाच्या विविध प्रकल्पावर खर्च केले जातात. तसेच दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये ठाणे शहर कचरामुक्त करण्यासाठी निधी प्रस्तावित केला जातो. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही.

ठाण्यातील कचर्‍याच्या समस्येमुळे रोगराईचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेचे घनकचरा विभागाचे अधिकारी फक्त भ्रष्टाचार करण्यामध्ये व्यस्त आहेत. पालिकेच्या आयुक्तांनी लवकरात लवकर नालेसफाईच्या कामात लक्ष दिले नाही. तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– स्वप्नील महिंद्रकर, ठाणे शहराध्यक्ष जनहित,विधी विभाग मनसे

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -