विविध राज्यात जाऊन लग्न सोहळ्यात पाहुणे म्हणून सामील व्हायच. पाहुण्यांमध्ये साधारणपणे ७ ते ८ वयोगटातील मुलांना चोरीसाठी तयार करायच. त्यांच्या मार्फत चोरी करायची. याच चोरीसाठीच्या मोडस ऑपरेंडीचा वापरत ठाण्यातील कासारवडवली पोलिसांनी एका सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. सुनेला लग्नात घालण्यासाठी आणलेल्या ४२ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग लग्नमंडपातून चोरीला गेल्यामुळे विवाह सोहळ्यावर विरजण आले होते. मात्र या गुन्ह्याचा सखोल तपास सुरु करून महिन्याभराच्या आत कासरवडवली पोलिसांना चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मिळवण्यास यश आले. ठाण्यातून थेट राजस्थान गाठत तब्बल १९ लाख रूपये इतक्या किंमतीचे ४२ तोळे सोने असा मुद्देमाल मिळवण्याची भरीव कामगिरी पोलिसांनी केली. या मोहीमेत मुद्देमाल मिळाला असला तरीही तरी चोरटे मात्र पोलिसांच्या हाती लागले नाहीत. मुद्देमाल मिळाल्याचा आनंद साजरा करावा कि चोरटे निसटल्याचे दुःख करावे अश्या मनस्थितीत पोलीस पथक मुद्देमालासह राजस्थान मधून ठाण्यात परतले.
लग्न समारंभातून चोरी झालेले ४२ तोळे सोने असा एकूण रु १९,०३,५०० /- किमतीचा मुद्देमाल परराज्यात जाऊन हस्तगत करण्यात कासारवडवली पोलिसांना मिळाले यश. #GoodDetection pic.twitter.com/CTXH1R1cHa
— Thane City Police (@ThaneCityPolice) December 24, 2020
ठाण्यातील घोडबंदर रोड या ठिकाणी जलसा लॉन या ठिकाणी १ डिसेंबर रोजी अनिता सिंग यांच्या मुलाचा विवाह सोहळा होता. अनिता सिंग यांनी सुनेसाठी मोठ्या प्रेमाने सोन्याचे १९ लाखाचे दागिने बनवले होते. मात्र विवाह सोहळा च्या ठिकाणी वधुवरासोबत फोटो काढण्यासाठी अनिता सिंग ह्या स्टेजवर गेल्या व त्यांनी दागिन्यांची बॅग शेजारच्या खुर्चीत ठेवली होती. मात्र काही वेळाने दागिन्यांची बॅग मिळून न आल्यामुळे अनिता सिंग यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार केली. ऐन विवाह सोहळ्यात दागिन्यांची चोरी झाल्यामुळे खळबळ उडाली होती. विवाह सोहळ्यासाठी जमलेल्या पाहुण्यांमध्ये चोरीच्या प्रकारावरून कुजबुज सुरु झाली होती.
मात्र पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास योग्यरीत्या हाताळून विवाह स्थळावरून मिळालेल्या पुराव्यावरून चोरट्यांचा शोध घेतला असता विवाह सोहळ्यात चोऱ्या करणारी टोळी राजस्थान राज्यातील राजगढ येथे असल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली. या माहितीवरून कासारवडवली पोलीस ठाण्याचे एक पथक राजस्थान येथे रवाना झाले . राजस्थान येथील राजगढ येथे माहिती मिळवून पोलीस पथक पाचोर तालुक्यातील गुलखेडी या गावात दाखल झाले . मात्र पोलीस आल्याचे कळताच चोरटयांनी तेथून पळ काढला . मात्र तपास पथकाने त्याच्या घरी छापे टाकून चोरीला गेलेले १९ लाखाचे दागिने हस्तगत केले आहे.