ठाणे महानगरपालिकेच्या ‘गलिच्छ वस्ती निर्मुलन समिती’ ऐवजी यापुढे ‘झोपडपट्टी सुधारणा व पुनर्वसन समिती’ असा नावात बदल करण्यात आला आहे. शासनामार्फत ६ जानेवारी १९९० रोजीच्या परिपत्रकात शासन व्यवहारात ‘गलिच्छवस्ती’ या शब्दाऐवजी ‘झोपडपट्टी’ या शब्दप्रयोगाचा वापर कटाक्षाने करावा असे आदेश देण्यात आले आहेत, या पार्श्वभूमीवर २२ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी जाहीर केल्याचे झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन समितीच्या सभापती साधना जोशी यांनी नमूद केले.
ठाणे महापालिकेमध्ये विद्यमान पाच विशेष समित्या कार्यरत आहेत, यामध्ये गलिच्छ वस्ती निर्मुलन समिती आहे, या समितीच्या नावामध्ये बदल करण्याबाबत सभापती साधना जोशी व सर्व समिती सदस्यांनी सातत्याने महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे पाठपुरावा केला होता, त्यानुसार प्रशासनाच्यावतीने सदरचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वंकष चर्चा करुन या प्रस्तावास एकमताने मंजुरी दिली आहे. यापुढे ‘गलिच्छ वस्ती निर्मुलन समिती’चा उल्लेख ‘झोपडपट्टी सुधारणा व पुनर्वसन समिती’ असा केला जाईल असे झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन समितीच्या सभापती साधना जोशी यांनी स्पष्ट केले.