एका दागिन्यांच्या दुकानाच्या भिंतीलाच भगदाड पाडून सुमारे ७५ लाखांचे दागिचे चोरल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. चोरी करण्यासाठी बाजूचा गाळा भाड्याने घेऊन अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचे उघड झाले असून याप्रकरणी डोंबिवलीतील विष्णू नगर पोलिस अधिक तपास करीत आहेत. डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोडवर रत्न सागर नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात भिंतीला भगदाड पाडून चोरट्याने ११० किलो चांदी आणि काही सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, रत्न सागर ज्वेलर्सच्या शेजारीच असलेला गाळा काही तरुणांनी भाड्याने घेतला होता. हे तरुण झारखंड येथील राहणारे होते. त्यांनी मोमोज तयार करण्याचा बोर्ड लावला होता. ही घटना घडल्यानंतर चोरटे पसार झाले असून विष्णू नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत त्यांचा तपास सुरु केला आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज परिसरातील एका ज्वेलर्स दुकानात देखील चोरी झाली होती, मात्र त्यातील आरोपी नेपाळी होते . त्याचप्रकारे पुन्हा डोंबिवलीत घटना घडल्याने ज्वेलर्समध्ये एकच दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे.