कल्याण । भारतीय संस्कृतीतील सण समारंभ उत्सव म्हणजे आनंदाचा ठेवा. सध्याच्या बदललेल्या पर्यावरणाच्या वातावरणामध्ये नैसर्गिक आणि इकोफ्रेंडली होळी साजरी करणे ही काळाची गरज ठरत आहे. अशाच वेळी जिल्हा परिषद शाळा राहनाळ इकोफ्रेंडली होळी आणि धुळवड साजरी करून मुलांनी आनंद साजरा केला.
राहनाळ शाळेत होळी, धुळवड सणाच्यानिमित्ताने पारंपारिक होळी बरोबरच राजश्री पाटील, अनघा दळवी, चित्रा पाटील या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी बीट, गाजर, झाडाची पान फले, आणि हळद यांच्यापासून नैसर्गिक रंग तयार केले. आजूबाजूचा कचरा, शेणाच्या गोवर्या, कापूर, विद्यार्थ्यांच्या मनातील वाईट विचार जाळण्यासाठी होळीच्या भोवती पताका म्हणून मुलांच्या मनातील नकारात्मक कागदावर लिहून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थीनी सिद्धी व परी यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. यावेळी संध्या जगताप, रसिका पाटील यांनी होळीची पारंपरिक गीते सादर केली.
होलीकेची कथा अंकुश ठाकरे यांनी सांगितली. केंद्रप्रमुख शरद जाधव यांनी होळी सणाचा विज्ञानाशी असलेला संबंध उलगडून सांगितला. यावेळी ग्रामपंचायत लिपिक विश्राम नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिला कडू, सदस्य प्रतिभा नाईक व पालक उपस्थित होते. होळीसाठी जिवंत झाड तोडू नये, पाण्याची बचत करावी, केमिकल मिश्रित रंग वापरू नये, प्लॅस्टिक पिशव्या आणि फुगे एकमेकांवर मारू नये असा सल्ला उपक्रमाची संकल्पना असलेले शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी मुलांना दिला. या इकोफ्रेंडली होळीची चर्चा संपूर्ण राहनाळ गावात होत आहे.
अंबरनाथमध्ये प्रथमच युवा रंग महोत्सव
अंबरनाथ मध्ये यंदा प्रथमच अंबरनाथ युवा रंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. अंबरनाथ युवा रंग महोत्सवामध्ये आंतराष्ट्रीय कलाकार असलेली डीजे स्मिता चौधरी हिने अंबरनाथच्या तरुणांना आपल्या लाईव्ह डीजेच्या तालावर बेधुंद केले. अंबरनाथ पूर्वेच्या साई सेक्शन परिसरातील अटल उद्यानात 9 ते 1 वाजेपर्यंत कल्याण युवासेना निरीक्षक निखिल वाळेकर यांच्या माध्यमातून अंबरनाथ युवा रंग महोत्त्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यामध्ये लाईव्ह डीजे, लाईव्ह फूड काउंटर्स, नैसर्गिक रंग, रंगीत सजावट, आकर्षक खेळ आणि सेल्फी पॉईंट अशी व्यवस्था करण्यात आली होती ज्या प्रकारे धुलिवंद मुंबई, ठाणे सारख्या शहरात साजरी होते त्याच प्रकारचा आनंद अंबरनाथकाराना घेता यावा यासाठी अंबरनाथ शहरात प्रथमच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून अंबरनाथकारानी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला असल्याची माहिती आयोजक निखिल वाळेकर यांनी दिली.
होळी निमित्ताने शहरातील डॉक्टरांचे संमेलन
उल्हासनगरात मेडिकल असोशियशन (उमा)च्या वतीने आयोजित होळी मिलन सम्मेलनात खासदार श्रीकांत शिंदे यांनी जल्लोशात होळी साजरी केली असून या संमलेनात दोनशे डॉक्टर आणि मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. उल्हासनगर मेडिकल असोशियशन चे अध्यक्ष राजू उत्तमानी यांच्या नेतृवाखाली हॉटेल जवाहरमध्ये यंदा देखील होळी उत्सव साजरा केला. या होळी मिलन संमेलनासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान उल्हासनगरच्या सर्व डॉक्टरांनी खासदार शिंदे यांच्याकडे शहराच्या विकासासाठी साकडे घातले. शिंदे यांनी देखील याकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी माजी अध्यक्ष डॉ. नरेंद्र पंजवानी डॉ. प्रकाश तोरणी, डॉ. प्रकाश नाथानी, डॉ. प्रभू आहुजा, डॉ. राजा रिझवानी आणि राजेश ठाकूर समवेत शेकडो डॉक्टर उपस्थित होते.