मागील चार दिवसापासून मुंबईसह उपनगराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील जनजीवन देखील विस्कळीत झाले असून रेल्वे, रस्ते वाहतुकीला देखील त्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मुंबईची लाईफलाईन देखील कोलमडली. पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रखडल्या. तर, काही गाड्या रद्द करण्यात आल्या. पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा स्टेशन पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. वडोदरा एक्सप्रेसमधील प्रवासी पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते. नालासोपारा ते वसई दरम्यान प्रचंड पावसाने अडकून पडलेल्या वडोदरा एक्स्प्रेस मधल्या १७०० ते २००० प्रवाशांची पालघर जिल्हा प्रशासनाने एन डी आर एफ च्या जवानांच्या सहाय्याने सुटका केली आहे. या प्रवाशांना नायगाव स्टेशनपर्यंत आरटीओ च्या मदतीने खासगी बसेसची व्यवस्था करून आणण्यात आले तसेच त्यांना जेवणाची सोय करून देण्यात आली. हतबल झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांना देखील यामुळे दिलासा मिळाला एन डी आर एफ चे जवान कुठल्याही अडथळ्याविना नालासोपारा पर्यंत पोहचावे म्हणून ठाणे, पालघर पोलिसांनी ग्रीन कोरीडॉर तयार केला होता.
नालासोपारा ते वसई दरम्यान प्रचंड पावसाने अडकून पडलेल्या बडोदा एक्स्प्रेस मधल्या १७०० ते २००० प्रवाशांची पालघर जिल्हा प्रशासनाने एन डी आर एफ च्या जवानांच्या सहाय्याने सुटका केली.https://t.co/kAZQYJnEWZ pic.twitter.com/sdPRaP8GzO
— My Mahanagar (@mymahanagar) July 10, 2018
सुरत – मुंबई बससेवा
मुंबईकडे येणारे शेकडो प्रवासी सध्या सुरत रेल्वेस्थानकात अडकून पडले आहेत. या प्रवाशांसाठी गुजरात परिवहन महामंडळाने गाड्यांची व्यवस्था केली आहे. सुरतहून बोरिवली आणि मुंबई सेंट्रलसाठी ६ गाड्या सोडण्यात आल्या आहेत. प्रवाशांची संख्या पाहता आणखी देखील गाड्या सोडण्यात येणार आहेत.
मुंबईची लाईफलाईन देखील विस्कळीत
मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी रेल्वे देखील पावसामुळे विस्कळीत झाली आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील गाड्या या उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. अनेक सखल भागांमध्ये पाणी देखील साचले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.