राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला असताना आज, गुरुवारी सकाळी सलग चौथ्या दिवशी शिवसेना नेता संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली. तसेच जे १४५ चा आकडा असल्याचा दावा करतील, त्यांनी सत्ता स्थापन करावी, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपला लगावला. तसेच शिवसेना आमदारांच्या वाऱ्यालाही उभं राहण्याची कोणाची हिंमत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. अस्थिर परिस्थितीत यंत्रणा हाती असलेल्यांकडून फोडाफोडाचे प्रयत्न होतात. मात्र शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचे वैयक्तिक वैर नाही. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा पुनरुच्चारही यावेळी संजय राऊत यांनी केला.
Sanjay Raut,Shiv Sena on reports of Shiv Sena shifting its MLAs to a resort: There is no need for us to do this, our MLAs are firm in their resolve and committed to the party. Those who are spreading such rumours should worry about their MLAs first. #Maharashtra pic.twitter.com/PnWTzTLtqW
— ANI (@ANI) November 7, 2019
काय म्हणाले संजय राऊत
शिवसेना आमदार निष्ठावान आहेत. ते आमदार फुटणार नाहीत आणि शिवसेना आमदारांच्या आसपास फिरकण्याची कुणाची हिंमत होणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला. तसेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, ही गोड बातमी आहे. सुधीर मुनगंटीवार स्वतः ही बातमी देतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. आज, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते आमदारांना मार्गदर्शन करुन विश्वासात घेतील, अशीही माहिती त्यांनी दिली.