विशेष गाड्यांसाठी आतापर्यंत ८० हजाराहून अधिक प्रवाश्यांनी १६.१५ कोटी रुपयांची तिकिटं बुक केली आहेत, असं भारतीय रेल्वेने मंगळवारी सांगितलं. रेल्वेच्या माहितीनुसार आतापर्यंत येत्या सात दिवसांसाठी १६.१५ कोटी रुपयांचे ४५,५३३ (पीएनआर) बुकिंग झालं आहे. या तिकिटांवर सुमारे ८२,३१७ लोक प्रवास करतील. ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर सोमवारा ११ मे रोजी पहिल्या तीन तासांत ५४,००० पेक्षा जास्त प्रवाश्यांनी ३०,००० तिकिटे बुक केली. १० मे रोजी रेल्वेने १२ मेपासून विशेष १५ गाड्या सोडणार असल्याचं घोषित केलं. तिकिट विक्रीतून रेल्वेला सुमारे दहा कोटींचा महसूल मिळाला आहे.
हेही वाचा – पीएफचे पैसे मिळण्यास होतोय विलंब, जाणून घ्या कारण
सर्व तिकिटे एसी वर्गासाठी आरक्षित आहेत. सोमवारी दुपारी चार वाजल्यापासून रेल्वेने प्रवास करण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांना तिकिटे बुक करता येणार असल्याचं सांगितलं होतं. पण संध्याकाळी चार वाजता आयआरसीटीसीची वेबसाइट उघडताच क्रॅश झाली. त्यानंतर रेल्वेने सायंकाळी सहा वाजल्यापासून बुकिंगसाठी परवानगी दिली. तथापि, हावडा-नवी दिल्ली ट्रेनची सर्व तिकिटे पहिल्या दहा मिनिटांतच बुक करण्यात आली. हावडा-नवी दिल्ली ट्रेन आज सायंकाळी ५.०५ वाजता धावेल. संपूर्ण तिकिटे मुंबई ते दिल्ली मार्गावर १२ ते 17 मे साठी बुक करण्यात आली आहेत. त्याचवेळी, भुवनेश्वर-नवी दिल्ली गाड्यांची सर्व तिकिटे संध्याकाळी ६.३० पर्यंत विकली गेली.