तुम्ही विमानामध्ये बसून काही हजार फुटांवरुन प्रवास करत आहात आणि अचानक तुमच्या विमानात बाँब ठेवल्याचं तुम्हाला कळतंय… अशावेळी तुमची स्थिती काय होईल? काहीसा असाच प्रकार आज इंडिगो कंपनीच्या जयपूर-मुंबई विमानात घडला. विमानात बाँब ठेवला असल्याचे समजल्यावर प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.
नेमकी घटना काय?
मंगळवारी पहाटे इंडिगो कंपनीचे हे विमान जयपूर विमानतळावरुन मुंबईकडे निघणार होते. मात्र, उड्डाणाच्या काही वेळ आधीच विमानात बाँब ठेवल्याचा एक निनावी फोन आला. या फोनमुळे जयपूर विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली. विमानातील प्रवाशांचा जीव धोक्यात असल्यामुळे सगळ्यात आधी विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. ही बातमी समजताच प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले.
IndiGo call centre received a bomb threat call for its Jaipur-Mumbai flight in the early morning hours today. More details awaited. pic.twitter.com/l3zv1r5HY8
— ANI (@ANI) June 19, 2018
‘फेक कॉल’चा अधिक तपास सुरु
मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास इंडिगो कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा कॉल केला. यावेळी जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या 6E 218 या विमानामध्ये बाँब ठेवला असल्याची माहिती या व्यक्तीने फोनवरुन दिली. यामुळे सुरक्षकांनी तातडीने सूत्र हलवत पुढील कारवाई पार पाडली. मात्र, याबाबत सखोल तपास केला असता हा फोन खोटा असल्याचं उघडकीला आलं. धमकीचा फोन खोटा असल्याचे जरी उघड झाले असले तरी हा फोन नेमका कुठून आला होता आणि कोणा केला होता याबबत अद्याप तपास चालू आहे.
दरम्यान बाँब ठेवला असल्याची धमकी खोटी असल्याची खात्री पटल्यानंतर आणि संबधित सुरक्षिततेची कारवाई पूर्ण झाल्यानंतर, इंडिगोच्या त्या विमानाने जयपूरकडून मुंबईकडे उड्डाण केलं.