मसूद अझहरला दहशतवादी ठरवण्याचे भारताचे प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी ठरल्याचं म्हणत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. ‘दुबळे पंतप्रधान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना घाबरतात. चीन जेव्हा कधी भारताविरोधात कारवाई करतं तेव्हा एक शब्दही तोंडाबाहेर येत नाही,’ असं ट्वीट करत राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. मात्र, राहुल यांच्या याच ट्वीटला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनेदेखील एक ट्वीट केलं आहे. भाजपने केलेल्या ट्वीटमध्ये ‘नेहरुंमुळेच मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात अपयश आलं’ असं म्हटलं आहे. ‘तुमच्या पणजोबांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळाची भारताला मिळत असलेली स्थायी सदस्यत्वाची जागा, चीनला भेट म्हणून दिली नसती तर चीन आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळामध्ये नसता.’ असं याट्वीटमध्ये म्हटलं गेलं आहे. याशिवाय ‘तुमच्या कुटुंबाने केलेल्या चुका भारत दुरुस्त करत आहे. दहशतवादाविरुद्धची लढाईही भारत नक्कीच जिंकेल. त्यामुळे हा विषय मोदींवर सोडून तुम्ही चीनच्या शिष्टमंडळांना गुप्तपणे भेटत रहा’, अशी टीकाही या ट्वीटद्वारे करण्यात आली आहे.
China wouldn’t be in UNSC had your great grandfather not ‘gifted’ it to them at India’s cost.
India is undoing all mistakes of your family. Be assured that India will win the fight against terror.
Leave it to PM Modi while you keep cosying up with the Chinese envoys secretly. https://t.co/lAyp12CXBD
— BJP (@BJP4India) March 14, 2019
‘जैश-ए-मोहम्मद’चा सर्वेसर्वा मसूद अझहरला याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांत चीनने पुन्हा एकाद आडकाठी केली. याप्रकरणी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला. दरम्यान, या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर ट्वीटरद्वारे तोफ डागली. ‘मोदी चीनच्या अध्यक्षांना घाबरतात… तसंच गुजरातमध्ये शी जिनपिंग यांच्याबरोबर फिरणं, दिल्ली दर्शन करणं आणि चीनमध्ये त्यांच्यासमोर झुकणं ही पंतप्रधान मोदींची चीनसोबतची कुटनिती आहे’, अशी टीका राहुल यांनी मोदींवर ट्वीटद्वारे केली आहे. त्यांच्या याच ट्वीटला आता भाजपने सडेतोड उत्तर दिलं आहे.