राफेलच्या करारात घोटाळा असल्याचा काँग्रेस सुरुवातीपासून आरोप करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत राफेल कराराविषयी मोदी खोटं बोलतात असल्याचा आरोप केला होता. आता राफेलचे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचले आहे.
करार रद्द करण्याची मागणी
राफेल करारात घोटाळा होत असल्याचा आरोप करत वरिष्ठ वकील मनोहर लाल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राफेल विमानांच्या खरेदीत घोटाळा असल्याने तो करार रद्द करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
काँग्रेसने केले होते आरोप
राफेल विमानांच्या खरेदीसाठी यूपीए सरकारने केलेल्या कराराच्या तिप्पट रक्कम मोजून मोदी सरकारने करार केल्याचा काँग्रेसने आरोप केला. यूपीए सरकारने एकूण १२६ विमानांसाठी हा करार केला होता. यातील १८ विमाने फ्रान्समध्ये तर उर्वरित १०८ विमानांची निर्मिती डसॉल्ट कंपनी भारतात हिंदुस्तान ऍरॉनॉटिक्स लिमिटेड या कंपनीच्या मदतीने करणार होती. मात्र मोदी सरकारने अनुभवी हिंदुस्तान ऍरॉनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीला करार न देता मुकेश अंबानींच्या कोणताही अनुभव नसणाऱ्या रिलायन्सला दिला.