सध्या बॉलीवूडचा हॉट विषय म्हणजे कास्टिंग काऊच. दाक्षिणात्य अभिनेत्री श्री रेड्डीने केलेल्या आंदोलनानंतर बऱ्याच अभिनेत्रींनी याबद्दल आपले अनुभव सांगायला सुरुवात केली. मराठी सिनेसृष्टीत आपलं स्थान भक्कम केल्यानंतर आता बॉलीवूडमध्येही आपलं एक वेगळं स्थान निर्माण करत असलेली ‘वाजले की बारा’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकरने हिने वेबला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल मत मांडले आहे.
राझीच्या यशानंतर अमृता सध्या यशाची चव चाखत आहे. काही लोकांनी याचा अनुभव घेतलेला नाही मात्र त्याबद्दल बरेच ऐकले आहे. कास्टिंग काऊचविषयी नक्की तिचा काय अनुभव होता? तिला कधी अशा गोष्टीला सामोरं जावं लागलं का? याविषयी तिने मनमोकळेपणाने आपले अनुभव सांगितले. अमृता खानविलकर हे मराठी हिंदी चित्रपट आणि टीव्हीवरीलदेखील प्रसिद्ध नाव आहे. कास्टिंग काऊचबद्दल विचारलं असता “माणसं मूर्ख असतात, पण ती इतकी कशी मूर्ख असू शकतात, २० वर्षांपूर्वी आपल्या आयुष्यात काय घडलं त्यासाठी आता रडत बसण्यात काय अर्थ आहे?” असा थेट प्रश्न अमृता करते. “व्यक्तीशः मी कास्टिंग काऊच नावाच्या प्रकाराला कधीही बळी पडलेले नाही. माझ्या अशा या रागीट चेहऱ्यामुळे कदाचित मला असं विचारण्याचं धाडसच कोणी केलं नसेल. मी मेहनतीचा मार्ग निवडला आणि आज त्याच मार्गावर चालून इथपर्यंत येऊन पोचले आहे. त्या मार्गात कोणाही माझ्या वाट्याला आला तर मी त्याला नडणार.” अमृता आजही त्याच आत्मविश्वासाने या इंडस्ट्रीत उभी असल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवते.
सध्या ‘राझी’मधील साकारलेल्या भूमिकेसाठी अमृताला प्रेक्षकांकडूनदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट असो, वेबसिरीज असो वा निवेदन असो अमृता प्रत्येक ठिकाणी कामात झोकून देते हे नक्की.