कोरोना व्हायरस जगभरात पसरला असून या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी अनेक राष्ट्रांनी महत्त्वाची पावलं उचलली. यापैकी महत्त्वाचा निर्णय म्हणजे लॉकडाऊनचा. लॉकडाऊन सुरू केल्यापासून शहरातील हवेच्या प्रदूषणामध्ये कमालीची घसरण झाली आहे. ही प्रदूषित शहरांसाठी चांगली बाब आहे.
कोट्यवधीच्या संख्येने लोकसंख्या घरात बसून राहिली आहे. तसेच इतर ठिकाणी बंदिस्त झाले आहेत. हा बंदिस्तपणा कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी स्वीकारला आहे. या लॉकडाऊनचा परिणाम थेट पर्यावरण आणि पृथ्वीवर जाणवू लागला आहे. काही दिवसांपूर्वीच पृथ्वीवर असणाऱ्या ओझोन वायूच्या थराला असणारे छिद्र भरून निघत असल्याची माहिती समोर आली आहे. निरीक्षण आणि अभ्यासकांनी हे दिलासादायक वृत्त असल्याचे सांगितले आहे.
त्याबरोबरच आता पृथ्वीच्या पृष्ठभागातील थरांचा थरथरात कमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. ‘सीबीएस न्यूज’ने पृथ्वीच्या हालचालींचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांचा हवाला देत या विषयीचं वृत्त प्रसिद्ध केले.
अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, मानवी कृतीमध्ये आलेल्या या अल्पविरामामुळे हे सारं घडत आहे. वाहतूक बंदी, व्यापार बंदी आणि बऱ्याच मानवी कृती, हालचाली ठप्प झाल्यामुळे पृथ्वीच्या सर्वात वरच्या थराच होणार कंपन लक्षणीयरित्या कमी झाले आहे. कंपन किंवा थरथराट कमी झाल्यामुळे आता सर्वाधिक कमी तीव्रतेच्या भूकंपाच मापन आणि निरीक्षण करणं, ज्वालामुखीची हालचाल पाहणे संशोधकांसाठी सोपं झालं आहे. हा बदल जरी तात्पुरता असला तरी तो फायदेशीर आणल्याचे मत अनेक जणांनी व्यक्त केले आहे.