घरदेश-विदेशनोव्हेंबर अखेरपर्यंत गरिबांना मोफत धान्य

नोव्हेंबर अखेरपर्यंत गरिबांना मोफत धान्य

Subscribe

येत्या दिवाळी आणि छटपूजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत रेशनिंगवरून गरिबांना मोफत धान्य देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. पुढील ५ महिन्यांसाठी ८० कोटींहून अधिक गरीब नागरिकांना ५ किलो गहू किंवा ५ किलो तांदूळ मोफत दिले जातील, याबरोबर प्रत्येक कुटुंबाला १ किलो चणे दिले जाणार आहेत. पावसाळ्यात आणि त्यानंतर मुख्यत: कृषी क्षेत्रात अधिक काम होत असते. जुलैपासून हळूहळू सणांचे दिवस येतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनवरून सोमवारी दुपारी ४ वाजता देशाला संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले की, केंद्र सरकार आता संपूर्ण देशात एक रेशनकार्ड योजना लागू करणार आहे. यापुढे कोणतीही व्यक्ती कोठूनही आपले रेशन प्राप्त करू शकते, असे पंतप्रधान म्हणाले. गरीब, गरजवंतांना जर सरकार मोफत धान्य देत असेल तर त्याचे श्रेय देशातील शेतकरी आणि प्रामाणिक करदात्यांना जाते.

- Advertisement -

या योजनेच्या विस्तारात ९० हजार कोटींहून अधिक खर्च झाला असून गेल्या तीन महिन्यांचा खर्चही जोडला तर दीड लाख कोटी रुपये खर्च होतात, असेही मोदींनी सांगितले. आम्ही संपूर्ण भारतासाठी स्वप्न पाहिलं आहे, एक राष्ट्र, एक रेशनकार्ड योजना सुरू करण्यात येत आहे. याचा सगळ्यात मोठा लाभ त्या गरिबांना मिळेल जे रोजगार किंवा अन्य गरजांसाठी गाव सोडून अन्यत्र जातात, अन्य राज्यात जातात. सरकार आज गरिबांना, गरजूंना मोफत धान्य देऊ शकतेय, तर त्याचं श्रेय मुख्यत्वे दोन वर्गांना जात असून मेहनती शेतकरी आणि प्रामाणिक करदाते असे मोदी म्हणाले.

जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताने करोनाविरुद्ध चांगली लढाई लढली आहे. मात्र, अद्यापही संकट टळले नसून जास्तीची खबरदारी घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या काळात कडक नियम पाळण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत स्थानिक प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मास्कचा वापर, सामाजिक अंतर हे आजही महत्त्वाचे असल्याचे मोदींनी आजच्या भाषणात म्हटले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

स्वावलंबी भारतासाठी दिवस-रात्र काम करू
देशातील १३० कोटी जनतेने एकत्र येऊन काम केले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर आपण स्वावलंबी भारत बनवू शकू. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येत दिवस-रात्र काम करू, असे मोदी म्हणाले.

अनलॉक-१ पासून निष्काळजीपणा वाढला
अनलॉक १ सुरू झाल्यापासून देशात जरा बेजबाबदारपणा वाढला असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. हा निष्काळजीपणा चिंतेचा विषय असल्याचेही मोदी म्हणाले. प्रतिबंधित क्षेत्रावर विशेष लक्ष द्यावेच लागेल असेही मोदी पुढे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -