वृक्ष जगवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी सरकारकडे कोणतंही धोरण नसून सरकारची ५ कोटी वृक्ष लागवडीची मोहीम निव्वळ थोतांड आहे, तसेच सरकारची वृक्ष लागवड हे भ्रष्टाचाराचं कुरण आहे, अशी घणाघाती टीका करणारे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिका प्रशासनाने राग धरला आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत २२ ऑगस्ट रोजी नाशिक महापालिकेने आयोजित केलेला बेल महोत्सव तडकाफडकी लांबणीवर टाकला आहे. राज्य शासनाच्या नाराजीच्या भीतीने कार्यक्रम लांबणीवर टाकला की शिंदे यांनी कार्यक्रमास येण्यास नकार दिला याविषयी आता चर्चा झडू लागली आहे.
सह्याद्री देवराईचे जनक असलेले सयाची शिंदे हे महापालिकेच्या उद्यान विभागाचे ब्रँड ॲम्बेसेडर आहे. गेल्यावैली ३४ ठिकाणी देवराई प्रकल्पाचा त्याच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याअंतर्गत ६० दुर्मिळ प्रजातींचा समावेश असलेल्या ३००३ वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्याचवैली येत्या श्रावणात बेल महोत्सव भरवला जाणार असल्याचे शिंदे यांनी जाहिर केले होते. आरोग्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण असलेल्या बेलांचे तीन हजार झाडे शहरात लावली जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने 22 ऑगस्ट मुहूर्त निश्चित केला होता सर्व तयारी पूर्ण झाली होती. दरम्यान शिंदे यांनी राज्य शासनाच्या वृक्ष लागवडीवर टीका केल्यामुळे महापालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे वृत्त आहे. त्यातून 22 ऑगस्ट रोजी महारा महोत्सवाचा कार्यक्रम रद्द करून पुढे टाकल्याचे वृत्त आहे या संदर्भात पालिकेचे उद्यान विभागाचे अधीक्षक शिवाजी आमले यांचाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ होता .
काय म्हणाले होते सयाजी शिंदे-
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ३३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. परंतु, अभिनेते सयाजी शिंदे यांनी सरकारची ही वृक्ष लागवड योजनाच फसवी असल्याचं सांगत मुंबईत सरकारला जाब विचारला. ते म्हणाले की, वृक्ष जगवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी सरकारकडे कोणतंही धोरण नसून सरकारची ५ कोटी वृक्ष लागवडीची मोहीम निव्वळ थोतांड आहे. सरकारची वृक्ष लागवड हे भ्रष्टाचाराचं कुरण आहे. हे वृक्ष तुम्ही कुठे लावणार आहात? या वृक्षांच्या संवर्धनाची काय योजना तुमच्याकडे आहे? सरकारच्या नर्सरीमध्ये कोणत्या प्रकारच्या जातीची झाडं असून सरकार कोणत्या जातींच्या झाडांची लागवड करणार आहे? या झाडांचं जतन करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. हा निर्धार ३३ कोटी वृक्षांचा आहे की निराधार वृक्ष आहेत, हे पाहावं लागेल. सरकार केवळ ३३ कोटी वृक्ष लावण्यासाठी कोणत्याही खड्ड्यात झाडं लावत आहे. शाळांच्या अंगणातही झाडं लावली जात आहेत. मी १२ जिल्ह्यांतील २३ ठिकाणी वृक्ष लागवड केली आहे. मात्र त्याचं कधीच चित्रीकरण केलं नाही. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आम्ही नेमक्या ठिकाणी झाडं लावत आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांना या झाडांची माहिती नाही. त्यामुळे ते कुठेही झाडं लावत आहेत. त्यांना कोणत्या जागी झाडं लावली पाहिजेत याचीही साधी माहिती नाही. काटेश्वर नावाचं झाडच त्यांना माहीत नव्हतं. या झाडांवर उन्हाळ्यात ४०-५० पक्षी बसतात हे सुद्धा मंत्र्यांना माहीत नव्हतं. गिरीवृक्षाला सरकार उंदीरमारे हे नाव देऊन मोकळे झाले.