घरमहाराष्ट्र'ईव्हीएमला दोष देणाऱ्या विरोधकांची अवस्था बुद्धू मुलासारखी'

‘ईव्हीएमला दोष देणाऱ्या विरोधकांची अवस्था बुद्धू मुलासारखी’

Subscribe

'महाजनादेश यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्याच्या दुसऱ्या दिवशी जळगावमध्ये नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.

ईव्हीएमद्वारे घेण्यात येणारी निवडणुक प्रक्रिया सदोष असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ”निवडणूकीत अपयश आले म्हणून ईव्हीएमला दोष देणाऱ्या विरोधकांची अवस्था पेन खराब होते म्हणून परीक्षेत नापास झालो,” असे म्हणणाऱ्या बुद्धू मुलासारखी झाली असल्याचे ते म्हणाले. ‘महाजनादेश यात्रे’च्या दुसऱ्या टप्प्याच्या दुसऱ्या दिवशी ते सभेत बोलत होते.

विरोधकांची दुटप्पी भूमिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत असताना जनतेचा विचार केला नाही. त्यांनी जनतेची कामे करण्याऐवजी सदैव स्वतःची संस्थाने चालविण्यावर भर दिला. त्यामुळे आता जनता त्यांना सतत निवडणुकीत नाकारत आहे. मतदारांच्या मनात घर केल्याशिवाय मते मिळत नाहीत कारण मते मतदार देतो. ईव्हीएम नाही. हे विरोधकांनी लक्षात घ्यायला हवे. त्यांची अवस्था अशी झाली आहे की, अभ्यास नाही म्हणून नापास झालेला बुद्धू मुलगा सांगतो की, खरे तर आपण पास होणार होतो आणि मेरीटमध्येच येणार होतो पण पेन खराब असल्याने नापास झालो. त्यामुळेच विरोधक अपयशाबद्दल ईव्हीएमला दोष देत आहेत. निवडणुकीत यश मिळाले तेव्हा ईव्हीएम चांगले होते आणि अपयश आल्यावर ते वाईट असा दुटप्पीपणा विरोधक करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – उद्या शाळांना दहिहंडीची सुट्टीच! शिक्षण विभागानं केलं स्पष्ट!

‘समृद्ध महाराष्ट्रा’साठी जनादेश महत्त्वाचा

ते पुढे म्हणाले की, ”विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ईव्हीएमला शिव्या देत असताना आम्ही मात्र जनतेत जाऊन गेल्या पाच वर्षांत काय काम केले हे सांगत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, ”लोकशाहीमध्ये जनता हीच दैवत असते.” त्या दैवताचे दर्शन घेण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘बलशाली राष्ट्र’ घडत आहे तर आपल्याला ‘समृद्ध महाराष्ट्र’ घडवायचा आहे. त्यासाठी जनादेश हवा आहे.

जळगाव सदैव भाजपच्या पाठीशी

त्यांनी पुढे सांगितले की, ”जळगाव शहराच्या विकासासाठी नगरविकास खात्याच्या माध्यमातून १ हजार १० कोटी रुपये दिले आहेत. शहरात पिण्याचे पाणी व भुयारी गटाराची योजना सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या मदतीने हुडकोच्या कर्जाचा बोजा कमी केला असून जळगाव कर्जमुक्त करत आहोत. खानदेशातील सिंचन प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी दिला असून कामे सुरू आहेत. जळगाव शहर आणि जिल्हा सदैव भाजपच्या पाठीशी उभा राहिला आहे. तसेच जेव्हा-जेव्हा पक्षाला सत्ता मिळाली तेव्हा-तेव्हा भाजपने जळगाव आणि खान्देशला मदत केली आहे. यावेळीही आम्ही तसेच काम करत आहोत.”

- Advertisement -

विधानसभेत आमची कामगिरी दमदार

यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, ”पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करून आपण केलेल्या कामाची जनतेला माहिती देण्यासाठी आलेले देवेंद्र फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. त्यांनी पाच वर्षांच्या काळात अनेक संकटांवर मात केली. ‘महाजनादेश यात्रे’ला फार मोठा प्रतिसाद मिळत आहे. गावोगाव मोठ्या संख्येने स्वागत होत आहे. या विधानसभा निवडणुकीत आमची कामगिरी दमदार असेल तर विरोधकांची अवस्था इतकी गंभीर आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला कितीही प्रयत्न केले तरी ३०चा आकडा ओलांडता येणार नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -