घरताज्या घडामोडीकेंद्र सरकारची दुटप्पी भूमिका, पण राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी! - वडेट्टीवार

केंद्र सरकारची दुटप्पी भूमिका, पण राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी! – वडेट्टीवार

Subscribe

शेतकऱ्यांना मदतनिधी देण्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये टोलवाटोलवी सुरू असताना राज्य सरकारमधील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची भूमिका मांडली आहे. यासोबतच त्यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्षावर देखील टीका केली आहे. ‘राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतनिधीसाठी ४ जिल्ह्यांमध्ये २०० कोटींच्या मदतनिधीचं वाटप पूर्ण केलं आहे. त्यासोबतच राज्य सरकार धान उत्पादकांना यंदाही बोनस देणार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहून प्रामाणिक प्रयत्न करत असताना केंद्र विरोधक आरोप करत आहेत’, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

‘राज्य सरकार जर आपल्या पद्धतीने काम करतंय तर केंद्र सरकारची देखील काही जबाबदारी आहे. जर राज्य सरकार २०० कोटी देतंय, तर केंद्र सरकारने देखील तेवढीच जरी मदत दिली असती, तर शेतकऱ्याला दुप्पट मदत मिळाली असती. पण केंद्राने ती मदत दिली नाही. केंद्र सरकारकडे मदतीचे ७०० कोटी रुपये पडून आहेत. केंद्र सरकारने दुटप्पी भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारचे हक्काचे ३८ हजार कोटी रुपये येणं बाकी आहे’, असं देखील वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

केंद्र सरकारवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले, ‘केंद्रातले मंत्री म्हणतात राज्य सरकारने शेती नुकसानीच्या मदतनिधीसाठी प्रस्ताव पाठवले नाहीत. पण पद्धत अशी असते की आधी केंद्रीय पथक येऊन पाहणी करून जातं आणि त्यानंतर राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवले जातात. पण केंद्रीय पथक अद्याप पाहणीसाठी आलेलं नाही. तुम्ही पाहणी करू नका, पण किमान मदत तरी पाठवा’.

‘परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देणारा पैसा शेतकऱ्यांना वाटला. विदर्भात परतीचा पाऊस आला नाही, म्हणून हा पैसा तिथे वाटला नाही. पण त्यावरून विदर्भातल्या शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय’, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -