घरCORONA UPDATEरुग्णवाहिका सेवा, शौचालयांचे सॅनिटायझेशन अभावी जनता हैराण

रुग्णवाहिका सेवा, शौचालयांचे सॅनिटायझेशन अभावी जनता हैराण

Subscribe

सध्या या दोन्ही विधानसभा क्षेत्रांमध्ये रुग्ण दरवाढीची टक्के पहिल्या पाच क्रमांकामध्ये दिसून येत आहे.

भांडुप आणि विक्रोळी या दोन विधानसभा मतदार संघांमध्ये मोडणाऱ्या महापालिकेचा ‘एस’ विभाग हा कोरोनाबाधितांच्या यादीत सुरुवातीपासून बरेच अंतर ठेवून होता. परंतु भांडुपच्या खिंडीपाड्यातून सुरु झालेल्या या संसर्गाने पुढे भांडुपसह विक्रोळीकरांना खिंडीत गाठायला सुरुवात केले. त्यामुळे सध्या या दोन्ही विधानसभा क्षेत्रांमध्ये रुग्ण दरवाढीची टक्के पहिल्या पाच क्रमांकामध्ये दिसून येत आहे. परंतु एवढ्या मोठ्या या विभागाला अवघ्या तीनच रुग्णवाहिका असून या रुग्णवाहिका सेवा आणि दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टी चाळींमध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयांमध्ये प्रमाणशीर सॅनिटायझेशन होत नसल्याने येथील जनता हैराण झालेली आहे.

भांडुपमधील खिंडीपाडा, कोकण नगर, उत्कर्ष नगर, काजू टेकडी, रुक्मिणी नगर तसेच विक्रोळीतील कन्नमवार नगर, टागोर नगरसह कांजूर पूर्व आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारेानाबाधितांचे हॉटस्पॉट तयार होत आहे. आतापर्यंत या या विभागात एकूण बाधित रुग्णांची संख्या गुरुवारपर्यंत १८८२ एवढी झाली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. तर आतापर्यंत १०० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.  भांडुप परिसरात दाटीवाटीने वसलेल्या मोठ्या झोपडपट्ट्या आता तर त्यातुलनेत विक्रोळी, कांजूरमार्ग हा झोपडपट्टी व इमारती असा मिश्र वस्तीचा परिसर आहे. त्यामुळे भांडुपसह विक्रोळीतील दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालयांचे सॅनिटायझेशन प्रभावी होताना दिसत नाही.

- Advertisement -

सध्या या केवळ ३ रुग्णवाहिका आहेत. परंतु या रुग्णवाहिका १९१६ वरून नियंत्रित केल्या जातात. त्यामुळे विभागात एखादा रुग्ण असल्यास, विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही यावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे बऱ्याचदा चांगल्या रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होतात व चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांसाठी वेळीच उपलब्ध होत नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही १९१६वर संपर्क साधून रुग्णवाहिका उपलब्ध करून घ्यावी लागते. परिणामी बऱ्याच वेळा चिंताजनक असलेल्या रुग्णांना वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही आणि वैद्यकीय अधिकारी हतबल होवून हे सर्व पाहत असतो. त्यामुळे प्रशासनाने किमान वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एनओसीशिवाय विभागातील रुग्णवाहिकेचा वापर करू नये. तसेच केल्यास चिंताजनक असलेल्या रुग्णांना वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध होवू शकतात.

सॅनिटायझेशनच्या तीन वेगळ्या टीम

महापालिकेच्या एस विभागाच्या हद्दीत बुधवारपर्यंत १६४० एकूण रुग्णांची संख्या असून त्यातील ५७५ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. विभागात दिवसांतून ३ ते ४ वेळा सार्वजनिक शौचालयांचे सॅनिटायझेन केले जाते. गल्लीबोळातील सॅनिटायझेशनसाठी वेगळी टिम आणि प्रत्येक नगरसेवकाला दोन पंप दिले आहे.  एखादा रुग्ण आढळून आल्यानंतर त्याठिकाणी सॅनिटायझेशन करणारी वेगळी आणि सार्वजनिक शौचालयांचे सॅनिटायझेशन करणारी टिम वेगळी आहे. याशिवाय नगरसेवक ज्याठिकाणची सूचना करतात. तेथील सॅनिटायझेशन करणारी वेगळी टीम असल्याचे एस विभागाचे सहायक आयुक्त संतोष धोंडे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

खिंडीपाडा, सुर्यनगर, फुले नगर, तानाजी वाडी, विक्रोळी टागोर नगर आदी ठिकाणी बाधित रुग्ण आढळून येत असले तरी नाहूर अजून सुरक्षितच आहे. आतापर्यंत असलेल्या बाधित रुग्णांपैकी २२० रुग्ण हे पोलीस, वैद्यकीय व महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील आहे. त्यातील ४३ बाधित रुग्ण हे ४३ पेक्षा अधिक वयाचे आहेत, असे त्यांनी सांगितले. विभागात केवळ ३ रुग्णवाहिका आहेत. परंतु या रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली आल्यास चांगली सेवा देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कन्नमवार नगर, संत ज्ञानेश्वर नगर, जय भीम नगर, इंदिरा निवास, आंबेडकर नगर आदीं वस्तींसह इमारतींमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत रुग्णांची संख्या १०५ वर पोहोचली आहे. शौचालयांच्या सॅनिटायझेशनवर आमचा अधिक भर आहे. येथील शुश्रुषा रुग्णालय महापालिकेने ताब्यात घेऊन त्यांना मासिक ९८ लाख रुपये देत आहे. याठिकाणी १४० खाटांपैकी १०० खाटा महापालिकेच्या ताब्यात असल्या तरी रुग्णालय केवळ ४०ते ५० खाटांशिवाय कुणालाही प्रवेश देत नाही. आणि सध्या त्या रुग्णालयात ५० हजार रुपये अनामत भरल्याशिवाय रुग्णांना दाखल करतच नाही. – उपेंद्र सावंत, स्थानिक नगरसेवक, शिवसेना

माझ्या प्रभागात आतापर्यंत ६० ते ७० बाधित रुग्ण झाले आहेत. पण माझ्या प्रभागात सर्वांधिक जास्त डॉक्टर्स, पोलीसच अधिक बाधित झाले आहेत. रुग्णवाहिकांची मोठी समस्या या विभागात खुद्द पोलिसांनाही या रुग्णवाहिका सेवांचा वाईट अनुभव आला आहे. पावसाळा वाढल्यास हा आजार अधिक वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे किमान विधानसभा निहाय क्वारंटाईन केंद्र तसेच आरोग्य केंद्र उभारायला हवीत. शौचालयांची स्वच्छता ही दिवसांतून एकदा होत असून महापालिकेबरोबर आम्हीही खासगी पध्दतीने शौचालयांचे सॅनिटायझेशन करून घेत असतो. – सारीका पवार, स्थानिक नगरसेविका,भाजप

माझ्या प्रभागात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. कर्वेनगर व टागोर नगरमध्ये जास्त रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णवाहिका हीच प्रमुख समस्या असून राजावाडी किंवा खासगी रुग्णालयांमध्ये दाखल केले होते. परंतु खाटांचीही कमरता भासते.  मात्र, बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करताना एकाच घरातील दोन माणसांना नेताना उर्वरीतांना घरी ठेवले जाते. हीबाब गंभीर आहे. जर घर शौचालय असेल तर ही बाब योग्य आहे. येथील क्रॉम्प्टनच्या जागेत ७ ते ८ हजार क्षमतेचे क्वारंटाईन सेंटर उभारले जावू शकते. त्यामुळे याचा प्रस्ताव मी प्रशासनाला दिला आहे. – सुवर्णा करंजे, स्थानिक नगरसेविका, शिवसेना

गौतम नगर, चैतन्य नगर, गोखलेचाळ, पवारवाडी, तिरंदाज गावठाण, साईनाथ नगर आदी ठिकाणी बाधित रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णाला योग्य वेळी खाट उपलब्ध न झाल्याने तसेच एकाला व्हेंटीलेटर्स उपलब्ध न झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या भागात रुग्ण आढळून आल्यानंतर घरांचे आणि सार्वजनिक शौचालयांचे सॅनिटायझेशन केले जाते. तसेच सार्वजनिक शौचालयांचे सॅनिटायझेन आठवड्यात दोनदा केले जाते. – वैशाली पाटील, स्थानिक नगरसेविका,भाजप

कोकण नगर, उत्कर्षनगर, जामीम नगर, काजू टेकडी, बुध्द टेकडी आदी वस्त्यांमध्ये सर्वाधित बाधित रुग्ण आढळून येत आहेत. चाळ पध्दतीची घरे असल्याने प्रशासन अधिकाधिक क्वारंटाईन करण्यावर भर देत आहेत. सुरुवातीला प्रशासन सर्व सुविधा देत असली तरी येथील जनतेमध्ये जनजागृती झाली असून स्वत:हून मंडळे व संस्था पुढे येवून काम करत आहेत. जनता स्वत: काळजी घ्यायला लागली. शौचालयांचे सॅनिटायझेन दिवसांत एकदा होते. वैद्यकीय सुविधा फास्ट मिळाली तर कोणतीही अडचण भासणार नाही. रुग्णवाहिकांची मोठी समस्या आहेतच. – उमेश माने, स्थानिक नगरसेवक, शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -