जर तुम्हाला भाईंदर ते डोबिंवली प्रवास करायचा असेल तर किमान दोन तासांहून अधिक वेळ खर्ची करावा लागतो. एवढेच नाही तर हा प्रवास करण्यासाठी तुम्हाला एक तर ट्रेनचा प्रवास किंवा रस्त्याने जावे लागते. पण, आता हाच तुमचा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांचा झाला तर आणि तोही पाण्यातून… हो लवकरच तुम्हाला हा प्रवास अनुभवता येणार आहे आणि तोही बोटीने. ही माहिती दिलीय खुद्द मत्ससंवर्धन आणि बंदरविकास मंत्री अस्लम शेख यांनी. मुंबई आणि राज्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार जलवाहतुकीवर भर देणार असून आता भाईंदर ते डोंबिवली ही देखील जल वाहतूक सुरु करणार असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली. विशेष बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जलवाहतूक कशी वाढवता येईल याकडे देखील भर देण्यात येणार असल्याचे अस्लम शेख म्हणालेत.
राज्य सराकार करणार ८६ कोटींचा खर्च –
दरम्यान, भाईंदर ते डोंबिवली या जल वाहतुकीसाठी राज्य सरकार ८६ कोटी खर्च करणार असून, मेरिटाईम बोर्डामार्फत मीरा-भाईंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली जेट्टी तयार करण्यात येणार आहे. यावर सध्या चर्चा सुरू असून येत्या काही महिन्यात याची निविदा देखील निघणार आहे. विशेष बाब म्हणजे या चारही जेट्टी सोबत टर्मिनल इमारत देखील बांधण्यात येणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून खर्च करणार आहेत. सुरूवातीला या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार असून त्यानंतर रोरो सेवा सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.
दोन वर्षात भाईंदर-डोंबिवली प्रवासाला सुरुवात –
भाईंदर ते डोबिंवली जलवाहतूक येत्या दोन वर्षात सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून या मार्गावरून रोज ४० हजार प्रवासी प्रवास करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच, या मार्गावरील एका बोटीची क्षमता ही १०० प्रवासी इतकी असणार असून या बोटीचा स्पीड हा २५ नॉटीकल इतका असणार आहे. तसेच या बोटीसाठी ऑपरेटर फिक्स करण्यात येणार आहे.
” मुंबई आणि राज्यातील रस्त्यावर वाहतूक कोंडी तसेच रस्त्यावरील वाहनांची संख्या बघता राज्य सरकार जलवाहतुकीवर भर देणार असून, भाईंदर ते डोबिंवली हा जलवाहतूक मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न सुरु आहे. येत्या दोन वर्षात ही जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे.”
अस्लम शेख, मत्ससंवर्धन आणि बंदरविकास मंत्री