गेल्या लोकसभा निवडकीनंतर लागलेल्या निकालानंतर देशसह राज्यभरात विरोधी पक्षांमध्ये नाराजीचा सूर दिसला तो फक्त ‘ईव्हीएम’ मशिनच्याविरोधात. त्यामुळे सर्वच विरोधी पक्षांनी येत्या ९ ऑगस्टला असणाऱ्या क्रांतीदिनी ही नाराजी मोर्च्याच्या माध्यमातून विक्त करण्याचे ठरवले आहे. त्याकरिता विरोधी पक्षांनी जय्यत तयारी देखील सुरू केली आहे.
या ‘ईव्हीएम’विरोधी मोर्चात ‘ईव्हीएम’ला विरोध करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह प्रकाश आंबेडकर हे विरोधी पक्ष नेत्यांसह एकाच व्यासपीठावर असल्याचे पहायला मिळणार आहे.
‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका व्हाव्यात
लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजप आघाडीवर असताना विरोधकांनी ‘ईव्हीएम’विरोधात अधिकच तीव्र विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तर जाहीररीत्या पत्रकार परिषद घेऊन ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका व्हाव्यात, अशी भूमिका घेतली आहे. काँग्रेस तसेच राष्ट्रवादीतील नेत्यांनीही मशिनविरोधात भूमिका जाहीर केली आहे.
‘ईव्हीएम’विरोधात देशव्यापी आंदोलनाची गरज
नुकतीच राज ठाकरेंनी ‘ईव्हीएम’च्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट देखील घेतली होती. या भेटीनंतर राज यांनी काँग्रेसच्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. ‘ईव्हीएम’विरोधात देशव्यापी आंदोलन उभे राहण्याची गरज असल्याची भूमिका त्यांनी सोनिया यांच्याकडे मांडली होती.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका मतपत्रिकेच्या आधारेच व्हाव्यात, यासाठी विविध राजकीय पक्षांसह अनेक संघटना ९ ऑगस्टला मोर्चात सहभागी होणार आहे.