घरमुंबईमुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा

मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा

Subscribe

शिवसेनेला झाली गुजरातींची आठवण!

भाजपकडून निर्माण झालेल्या तगड्या आव्हानांमुळे आता शिवसेना मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कामाला लागली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन तयार करण्यात आली आहे. शिवसेनेने फक्त मराठी मतदारांवर अवलंबून न राहता मुंबईच्या कॉस्मोपॉलिटीन मतदारांना साद घालायचे ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून आता शिवसेनेकडून मुंबईसह राज्यातील गुजराती मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सगळ्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

- Advertisement -

त्यासाठी शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहे. या मेळाव्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रणे छापण्यात आली आहेत. येत्या 10 तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार आहे. यावेळी तब्बल 100 गुजराती बांधव शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता शिवसेनेची भाजपच्या पारंपरिक मतदारांना आकर्षित करण्याची ही खेळी कितपत यशस्वी ठरणार, हे येणारा काळच ठरवेल.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंचे ‘केम छो वरळी’
वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार्‍या आदित्य ठाकरे यांचे बॅनर्सही चर्चेचा विषय ठरला होता. आदित्य यांची वरळीतून उमेदवारी घोषित झाल्यानंतर अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने ‘केम छो वरळी’ असे गुजरातीतून पोस्टर्स लावले होते. या पोस्टर्सवरून विरोधकांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. यानंतर शिवसेनेला हे पोस्टर्स हटवावे लागले होते.

…जनाबसेनाने आपटा -भातखळकर
अजाण स्पर्धा भरवणार्‍या शिवसेनेला निवडणुका आल्या की, गुजराती वोटबँक आठवते. त्यामुळे शिवसेना गुजराती लोकांसाठी मेळावा आयोजित करून त्यांना भुलविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. मात्र शिवसेनेच्या भूलथापांना केवळ गुजराती बांधवच नव्हे तर संपूर्ण मुंबईकर भुलणार नाहीत, असा दावा भातखळकर यांनी केला आहे. उलट गुजराती बांधवांनी, ‘जलेबी ना फाफडा, जनाबसेनाने आपटा’, असे उत्तर देण्याचे ठरवले असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -