२६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईतील सीएसएमटी स्थानकासह अन्य ठिकाणी अतिरेकी हल्ला केला होता. या हल्ल्यात निर्दोष नागरीक मारले गेले होते. या घटनेला ११ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांचा बंदोबस्त वाढवला जाणार आहे. दुर्दैवाने अशा प्रकारचा हल्ला पुन्हा झाला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी रेल्वे पोलीस सज्ज आहेत. त्याकरता मध्य रेल्वे ६०० आणि पश्चिम रेल्वे १५०० सुरक्षा दलाचे जवान (आरपीएफ) रेल्वे स्थानकांत तैनात करणार आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्र औद्योगिक बलाच्या जवानांची तुकडीही तैनात करण्यात येणार आहे.
मुंबईवर समुद्रीमार्गे झालेल्या अतिरेकी हल्ल्याला ११ वर्षे पूर्ण होत असल्याने रेल्वे स्थानकांवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर सर्व स्थानकांवर आरपीएफ जवान तैनात केले जाणार असून त्यांच्या मदतीला महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आणि लोहमार्ग पोलिसांची कुमक तैनात करण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात २ हजार ७२९ सीसीटीव्हींचा पहारा असून आरपीएफच्या अधिकार्यांची २४ तास निगराणी असणार आहे. चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरीवली या गर्दीच्या स्थानकांतील बॅगेज स्कॅनर मशिनवर बॅगची तपासणी केली जाणार आहे.
तर मध्य रेल्वेतील सीएसएमटी, एलटीटी, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण स्थानकांतील प्रवेश द्वारावर अतिरिक्त रेल्वे पोलीस आणि आरपीएफ जवान तैनात केले जाणार आहेत. दरम्यान आरपीएफची १८२ हेल्पलाईन अधिक सक्षम करण्यात आली असून सूचना फलक आणि पॅसेंजर अनाऊन्समेंटद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यात येणार आहे.