इंग्लंडमध्ये मे महिन्यात सुरू होणार्या क्रिकेट विश्वचषकाला जिंकण्यासाठी भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. अनेक क्रिकेट समीक्षकांच्या मते भारतच हा विश्वचषक जिंकेल. मात्र, भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर या मताशी सहमत नाहीत. त्यांच्यामते भारत नाही, तर इंग्लंड हा विश्वचषक जिंकण्याचा प्रमुख दावेदार आहे.
इंग्लंडचा संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रमुख दावेदार आहे. विश्वचषक इंग्लंडच्या घरच्या मैदानात होणार आहे. म्हणून मी असे म्हणत नाही . त्यांनी मागील (२०१५) विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. मागील विश्वचषकामध्ये इंग्लंडचा साखळी सामन्यात बांगलादेशकडून पराभव झाला होता. या पराभवामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. मात्र, या पराभवातून त्यांनी धडा घेत संघाच्या कामगिरीत आणि खेळण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ बळकट झाला आहे, असे गावस्कर म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, इंग्लंडची टीम परिपूर्ण आहे. त्यांच्याकडे चांगले सलामीवीर आहेत. त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजदेखील अप्रतिम आहेत, तसेच त्यांची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांच्याकडे खूप चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. इंग्लंडला त्यांच्या देशात खेळण्याचाही फायदा होईल. जेव्हा आपण आपल्या देशात खेळतो, तेव्हा आपल्या पाठीशी आपल्या देशातील लोकांचा आधार असतो, तसेच परिस्थितीदेखील अनुकूल असते.
इंग्लंडचा विश्वचषकातील पहिला सामना ३० मे रोजी द.आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.