मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत २३ सामने खेळले गेले आहेत. या २३ सामन्यांपैकी ११ सामने जिंकण्यात पंजाबला यश आले आहे, तर मुंबईने १२ सामने जिंकले आहेत. त्यामुळे जर या सामन्यात पंजाबने पुन्हा बाजी मारली तर दोन्ही संघ बरोबरीला येऊ शकतात. आयपीएलच्या १२ व्या मोसमात पंजाब आणि मुंबई यांच्यात हा दुसरा सामना होणार आहे. याअगोदर मोहालीला पंजाब आणि मुंबई यांच्यात पहिला सामना खेळला गेला होता. त्या सामन्यात पंजाबने आपले ८ गडी राखत मुंबईचा पराभव केला होता. मुंबई आणि पंजाब याच्यातील दुसरा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर अर्थात वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
मुंबईच्या फलंदाजांपुढे आव्हान
गेल्या तीन सामन्यांपासून मुंबईचे गोलंदाज आपले चांगले प्रदर्शन दाखवत आहेत. याशिवाय मुंबई सध्या गोलंदाजांच्या नावावरुन ओळखली जात आहे. मुंबईकडे सध्या अल्झारी जोसेफ, जसप्रीत बुमरा, जेसन बेहनडॉर्फ सारखे गोलंदाज आहेत. तर मुंबईचे फलंदाजांना अद्यापही चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळालेले नाही. मुंबईकडे रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सुर्यकुमार यादव, युवराज सिंग, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या सारखे फलंदाज आहेत. या फलंदाजांकडे जास्त धावा करण्याची क्षमता आहे. मात्र, तरिही चाहत्यांना हवी तशी खेळी करण्यात मुंबईचे संघ अपयशी ठरले आहेत.