केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवण्यात आलेल्या योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधण्याकरता, पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी जयपूरमध्ये दाखल झाले. राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरात पंतप्रधान मोदींचा एक दिवसीय दौरा होता. यावेळी मोदींनी राजस्थानच्या विकासाठी एकूण २१०० कोटी रुपये भेट म्हणून दिले. जयपूरच्या सवाई मान सिंह स्टेडिअममध्ये मोदींचे भाषण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारत सरकार आणि राजस्थान सरकारने राबवलेल्या १२ प्रमुख योजनांच्या लाभार्थींशी मोदींनी संवाद साधला. एका ऑडिओ-व्हिज्युअल क्लिपद्वारे राबवल्या गेलेल्या योजनांचे सादरीकरण करण्यात आले. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह हेदेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान झालेल्या भाषणामध्ये मोदींनी विकासाशी संबंधित अनेक मुद्द्यांना हात घातला.
काँग्रेसवर साधला निषाणा
जयपूरमध्ये बोलतेवेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस पक्षाला देखील कोपरखळी मारली. ”काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आणि पूर्वमंत्री आजकाल जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळे लोक आता काँग्रेस पक्षाला बैलगाडी म्हणू लागले आहेत,” असं वक्तव्य मोंदीनी त्यांच्या भाषणादरम्यान केलं.
Congress ko aaj kal kuch log ‘bail-gaadi’ bolne lage hain. Congress ke kai diggaj neta aur purv mantri aajkal bail par hain: PM Modi while addressing a public rally in Jaipur pic.twitter.com/njQztJflmL
— ANI (@ANI) July 7, 2018
शेतकऱ्यांना दिला ‘दिलासा’
भाषणादरम्यान शेतकऱ्यांच्या मुद्द्यांविषयी बोलताना मोदी म्हणाले, ”आम्ही २०२२ पर्यंत शेतकऱ्यांची जीवनमर्यादा दुप्पट करु. भाजप सरकारने शेतकऱ्यांना सॉयल हेल्थ कार्ड दिले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू”. ‘केंद्रातील सरकार असो किंवा राज्यातील सरकार आमचा एकच अजेंडा राहील आणि तो म्हणजे देशाचा विकास. देशातल्या प्रत्येक नागरिकाला चांगले आणि सुरक्षित आयुष्य जगता यावे यासाठी आम्ही विविध योजना राबवू’ असंही मोदी यावेळी म्हणाले.