हरयाणामध्ये भारतीय जनता पक्षाची पुन्हा सत्ता येणार आहे. चौताला यांच्या जननायक जनता पार्टीने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचे मनोहरलाल खट्टर हे पुन्हा मुख्यमंत्री होणार असून उपमुख्यमंत्रीपद जेजेपीच्या दुष्यंत चौताला यांना दिले जाणार आहे. तशी घोषणा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी नवी दिल्लीत केली. हरयाणा विधानसभेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. भाजपला सर्वाधिक ४० जागा मिळाल्या होत्या. सरकार स्थापनेसाठी त्यांना सहा जागांची गरज होती. मात्र जेजेपीच्या दुष्यंत चौताला यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले. जेजेपीचे १० उमेदवार निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक आकडा भाजपने सहज पार केला आहे.
Dushyant Chautala, JJP leader: To give a stable govt to Haryana it was important for BJP & JJP to come together. I would like to thank Amit Shah ji and Nadda ji.Our party had decided that for the betterment of the state it is important to have a stable govt. #HaryanaAssemblyPolls pic.twitter.com/5YevGNJGdq
— ANI (@ANI) October 25, 2019
भाजपच्या खेळीवर विरोधकांची टीका
दरम्यान, लोकहित पक्षाचे नेते गोपाळ कंडा यांनी शुक्रवारी सकाळी भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. कंडा यांनी पत्रकारांना सांगितले की, “मी आणि सर्व अपक्ष विजयी उमेदवारांनी भाजपला कोणत्याही अटीविना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सहा जणांनी पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली होती.” कंडा यांचा पाठिंबा घेण्याच्या भाजपच्या या खेळीवर विरोधी पक्षांनी तर टीका केलीच आहे, पण भाजपच्या नेत्या उमा भारती यांनीही ताशेरे ओढले होते. उमा भारती यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये त्यांनी पक्षाला इशारा देताना लिहिले की, कंडा यांचा पाठिंबा घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या स्वच्छ प्रतिमेला डाग लागले.