बेकायदा कारवाई प्रतिबंध (यूएपीए) कायद्याअंतर्गत जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर, लष्कर-ए-तोय्यबाचा प्रमुख हाफिज सईद, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आणि झकी-उर-रहमान अली यांना भारताने दहशतवादी घोषित केले आहे. याअगोदरही आंतरराष्ट्रीय पातळीवर मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात भारताला यश आले होते. त्यानंतर यूएपीए या नव्या कायद्याअंतर्गत भारताने मसूद अजहर, हाफिज सईद, दाऊद इब्राहीम आणि झकी-उर-रहमान अली यांना दहशतवादी घोषित केले आहे. या सर्वांविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली आहे.
Masood Azhar, Hafiz Saeed, Dawood Ibrahim,Zaki-ur-Rehman Lakhvi declared terrorists under the amended Unlawful Activities (Prevention) Act pic.twitter.com/yXzV6NxL2c
— ANI (@ANI) September 4, 2019
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रिय गृहमंत्री पदाची सुत्रे हाती घेतले. गृहमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून अमित शहा दहशतवाद संपवण्यासाठी वेगवेगळे कायदे तयार करत आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये कडक बंदोबस्त तैनात केला आहे. काश्मीरच्या खोऱ्यात लपलेल्या अतिरेक्यांना शोधून त्यांना कंठस्नान घालण्याच्या बऱ्याच बातम्या समोर येत आहेत. काश्मीरचा विकास व्हावा या दृष्टीकोनाने काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचाही कायदा संमत करण्यात आला. त्याचबरोबर दहशतवादाला आळा घालण्यासाठी अमित शहा यांनी बेकायदा कारवाई प्रतिबंध (यूएपीए) कायदा राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहात संमत केला. या कायद्याअंतर्गत दहशतवादी कारवाई करणाऱ्या किंवा त्या कारवाईंना मदत करणाऱ्यांना दहशतवादी ठरवण्याचा आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा कायदा संमत करण्यात आला. याच कायद्यान्वे आता मसूद अजहर, हाफिज सईद, दाऊद इब्राहीम आणि झकी-उर-रहमान अली यांना दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.
हेही वाचा – इस्लामाबादमध्ये स्फोट; जैश–ए– मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू?