सध्या जगात करोना व्हायरसबद्दल सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या व्हायरसने चीनमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता भारतात प्रवेश केला आहे. गुरुवारी केरळमध्ये करोना व्हायरसचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळला. आतापर्यंत चीनमध्ये या करोना व्हायरसमुळे २१३ जणांचा बळी गेल्याचं समोर येत आहे. तर जगभरात २१ देशांमध्ये हा व्हायरल पसरला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. याच पार्श्वभूमीवर या जीवघेण्या व्हायरसला जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. या व्हायरसचा सामना करता यावा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधता यावा याकरिता ही घोषणा करण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस अॅडनम असं म्हणाले की, ‘सगळ्यांनी एकत्र येऊन हा व्हायरस आणखी पसरू नये याकरिता प्रयत्न करायला हवा. आपण सगळे एकत्र येऊन या व्हायरसवर मात करू शकतो. काही देशांनी आपल्या नागरिकांना चीनच्या वुहान प्रांतात जाण्यास मनाई केली होती. तसंच वुहानमधून येणाऱ्या नागरिकांवर अनेक देशांनी बंदी घातली होती. चीन सोबत पूर्वेला असणारी सीमाही रशियाने बंद केली आहे. परंतु यामुळे प्रवास आणि व्यापार बंद करण्याची काही गरज नाही.’ तसंच ट्रेडोस अॅडनम यांनी मागील आठवड्यात चीनमध्ये जाऊन राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतल्याचं देखील सांगितलं.
"We don’t know what sort of damage this #2019nCoV virus could do if it were to spread in a country with a weaker health system.
We must act now to help countries prepare for that possibility"-@DrTedros— World Health Organization (WHO) (@WHO) January 30, 2020
याअगोदर जागतिक आरोग्य संघटनेने स्वाईन फ्लू, पोलिओ, जिका आणि दोन वेळा आफ्रिकामध्ये इबोला व्हायरसची लागण झाल्यामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली होती. या आणीबाणीच्या घोषणेनंतर तीन महिन्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला जातो त्याच्या आधारावर जागतिक आरोग्य संघटना जगभरातील नागरिकांसाठी सूचना जारी करते. याचं पालन करून या गंभीर समस्येचा सामना करता येतो.
हेही वाचा – Budget 2020: पाच वर्षात अनेक क्षेत्रात भारताची मान उंचावली – रामनाथ कोविंद