राज्य मंत्रीमंडळ निर्णयात मुख्यमंत्री कार्यालयाकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा वारंवार होण्याचे प्रकरण ताजे असतानाच, आता सीएमओ कार्यालयाकडून उस्मानाबादचा मुद्दा समोर आला आहे. सीएमओच्या ट्विटमध्ये उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून आता आणखी एका नव्या वादाला सीएमओ कार्यालयाने तोंड फोडले आहे. आधीच औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्यावर कॉंग्रेसमधील धुसफूस समोर आली होती.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.#मंत्रिमंडळनिर्णय@AmitV_Deshmukh pic.twitter.com/qMed4OP6fV
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 13, 2021
धाराशिव उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय महाविद्यालय व त्याला संलग्न ४३० खाटांचे रूग्णालय निर्माण करणे या विषयाला अनुसरून मंत्रीमंडळ निर्णयात हा उल्लेख समोर आलेला आहे. या मुद्द्याच्या निमित्ताने आणखी एका शहराचे नामकरण अप्रत्यक्षरीत्या सरकारी नोंदीला करण्यात आले आहे. त्यामुळे आता उस्मानाबादचा मुद्दा हा विरोधकांना तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांनाही चर्चेसाठी आयता मिळणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या विभागाअंतर्गत झालेल्या मंत्रीमंडळ निर्णयामध्ये हा उस्मानाबादचा मुद्दा आज समोर आला आहे. याआधीच कॉंग्रेसने औरंगाबादचे संभाजीनगर या नामकरणाला आपला विरोध असल्याची भूमिका मांडली होती. या मुद्द्यावर आघाडीतील धुसफूस आणि नंतरची सारवासारव असे सगळे प्रकार समोर आल्यानंतर आता उस्मानाबादच्या मु्द्द्यामुळे या संपुर्ण नामांतराच्या मुद्द्यावर आणखी एक शहराची भर पडणार हे नक्की.