घरमुंबईत्रीसुत्री पाळा व लॉकडाऊन टाळा, राजेश टोपेंचे राज्यातील जनतेला कळकळीचे आवाहन

त्रीसुत्री पाळा व लॉकडाऊन टाळा, राजेश टोपेंचे राज्यातील जनतेला कळकळीचे आवाहन

Subscribe

प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी तेव्हा चला आता एकजूटीने कोरोनाला हरवूया असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोना संसर्ग फोफावू लागल्यापासून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे जातीने लक्ष देऊन कोरोनाविरोधातील उपाययोजना करत होते. परंतु राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. राज्यातील अमरावती, पुणे, नाशिक,यवतमाळमध्ये कोरोनाचा उद्रेक होत आहे. कोरोना गेलेला नाही. कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामुहिक लढाई लढावी लागणार आहे. असे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी पत्रात म्हटले आहे.

कोरोना विषाणु मागील वर्षभरापासून आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा पाठलाग करत होता. राजेश टोपेंनी कोरोनाला जवळही फिरकू दिले नाही. परंतु काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेश टोपे रुग्णालयात उपचार घेत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्र जारी करत म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुध्दची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योध्ये, विशेषतः डॉक्टर,नर्सेस,आरोग्यसेवक, पोलीस,स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करु शकलो. मात्र अद्यापही कारोना गेलेला नाही. तो पुन्हा डोके वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामुहिक लढाई लढावी लागणार आहे.

- Advertisement -

राजेश टोपे यांनी पुढे म्हटले आहे की, मी सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुध्द लढतो आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणु माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो, कोरोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या, परंतु कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सदभावना,प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा कोरोना विरुध्दच्या सामुहिक लढाईत सहभागी होणार आहे.

- Advertisement -

समजदार, संवेदनशिल व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला.मात्र आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. लॉकडाऊन टाळण केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिल की, मास्क,सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन टाळा. शेवटी स्वत:ची काळजी म्हणजेच कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी, प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी तेव्हा चला आता एकजूटीने कोरोनाला हरवूया असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनाची दुसरी लाट आहे की काय अशा संभ्रमात जनता पडली आहे. तसेच जर येत्या ८ दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्या कमी झाली नाहीतर राज्यात लॉकडाऊन करण्यात येईल असा इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -