मुंबई : उपनगरीय रुग्णालयांमध्ये अनेकदा मोठ्या शस्त्रक्रियांसाठी यंत्रसामुग्री उपलब्ध नसते. त्यामुळे अशा रुग्णालयातून रुग्णांना दुसरीकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. पण, आता उपनगरीय रुग्णालयांचा कायापालट होणार आहे. त्यासाठी पालिका सज्ज झाली आहे. येत्या काही महिन्यात उपनगरीय रुग्णालये ‘मल्टिस्पेशालिटी’ बनवण्यात येणार आहेत. त्यासाठी जवळपास २ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईतील जवळपास ७५ टक्के लोकसंख्या ही उपनगरात आहे. त्या तुलनेत उपनगरीय रुग्णालयांमध्ये पुरेशी सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांची अनेकदा हेळसांड होते. म्हणून उपनगरातील ६ रुग्णालयांचे टप्प्याटप्प्याने अत्याधुनिकीकरण आणि विस्तारीकरण केले जाणार आहे.
याविषयी तिन्ही पालिका रुग्णालयाचे प्रमुख आणि वैद्यकीय संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितलं की, जवळपास ७५ टक्के लोकसंख्या ही उपनगरात आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना चांगल्या रुग्णालयातून सेवा आणि उपचार मिळणे गरजेचे आहे. केवळ केईएम, सायन आणि नायर रुग्णालयातून उपचार होणे शक्य होत नाही. म्हणून पुढच्या अनेक वर्षांचा विचार करता तेथील रुग्णालये सक्षम करण्याचा आपला विचार आहे. त्यानुसार, उपनगरातील ५ – ६ रुग्णालये निवडली गेली आहेत. त्यात ४ युनिट आहेत. त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने त्यात अत्याधुनिकीकरण करण्यात येईल. त्यासाठी २ ते ३ हजार कोटींचा खर्च आहे. याबाबतचा निर्णय पालिकेने घेतला असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे तिथल्या रुग्णांना मोठ्या रुग्णालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. घराजवळच्या रुग्णालयांमध्येच त्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील.
या कामात उपनगरीय रुग्णालयांत अत्याधुनिक सुविधा पुरवल्या जाणार आहेत. ज्यात जनरल रुग्णालयात ३०० अतिरिक्त खाटा, तर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांसाठी १५० खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासोबतच याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिकांचीही नियुक्ती केली जाणार आहे. वैद्यकीय अधिकार्यांची २७४ पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहितीही डॉ. सुपे यांनी दिली आहे.
असा टप्प्याटप्प्याने होणार रुग्णालयांचा विकास
या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात बोरीवलीतील भगवती रुग्णालय, कांदिवलीतील शताब्दी रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयांचा समावेश आहे. तर, दुसर्या टप्प्यात मुलुंडच्या एम.टी. अग्रवाल रुग्णालय, भांडूप मल्टिस्पेशालिटी, विक्रोळीच्या महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाचा समावेश आहे. तिसर्या टप्प्यात गोवंडीच्या पंडित मदन मोहन मालविय रुग्णालय आणि वांद्रे येथील भाभा रुग्णालयाचा समावेश आहे.