घरमहाराष्ट्रनिसर्गाचे नियम समजून विकासाचे नियोजन करा; मुख्यमंत्र्यांनी केली सूचना 

निसर्गाचे नियम समजून विकासाचे नियोजन करा; मुख्यमंत्र्यांनी केली सूचना 

Subscribe

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. 

पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संस्कार आपल्या भारतीय संस्कृतीने दिला आहे. त्यामुळे विकासकामाचे नियोजन करताना निसर्गाचे नियम समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा निसर्ग आपल्या पद्धतीने न्याय देण्याचे काम करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २०२०-२१ या वर्षातील ‘माझी वुसंधरा’ अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, महापालिकांचा, अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या विभाग, जिल्ह्यांचा, अधिकार्‍यांचा मुख्यमंत्री आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या अभियानाच्या २०२१-२२ या वर्षातील अंमलबजावणीचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शहरातून हरित तृणांची मखमल आता नाहीशी झाली आहे. आपण पृथ्वीला वसुंधरा म्हणतो आणि तिची गणना स्क्वेअर फुटात करतो. वन बीएचके, टू बीएचके सारख्या तुकड्यांमध्ये ती वाटतो. पण विकासाचा हा असा ध्यास आपल्या जीवनाला घातक ठरत आहे. आपण पंचमहाभूतांपासून दूर जात आहोत. त्यांची जपणूक करण्याऐवजी आपण त्यांच्यावर हुकुमत गाजवत आहोत. कोरोनाकाळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्व पटले. आपण ऑक्सिजन निर्मिती करत आहोत पण निसर्गाने दिलेले झाडांच्या रूपातील नैसर्गिक ऑक्सिजन प्लांट आपण उद्ध्वस्त करत चाललो आहोत, याकडे ठाकरे यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

- Advertisement -

आपली संस्कृती ही पर्यावरणाची जपणूक करणारी संस्कृती होती. त्यामुळेच आपल्याकडे वटपौर्णिमेला वडाची पूजा झाली, नागपंचमीला नागांची पूजा केली जाते. आपल्या पूर्वजांनी पंचमहाभूतांचे रक्षण केले. परंतु आता आपल्या घरासमोर साधे तुळशीवृंदावन बांधण्याला जागा नाही इतक्या इमारती राक्षसासारख्या उभ्या राहात आहेत आणि आपण विविध दिनांच्या निमित्ताने फक्त शुभेच्छा देत आहोत. परंतु या शुभेच्छांचा कोरडेपणा थांबून जैवविविधतेने समृद्ध अशा महाराष्ट्राला जपण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

पर्यावरण रक्षणाचे काम एका विभागाचे नाही तसेच ते एका खात्यासाठीही नाही. हे मानवकल्याणाचे, राज्य आणि देशाच्या हिताचे काम आहे. त्यातून आपलेच जीवन सुसह्य होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. निसर्गाचे हे देणे जपण्यासाठी निसर्गावरचे आपले अतिक्रमण थांबवण्याची गरज आहे. तसेच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करताना लावलेले वृक्ष जगवले जावेत, सागरतटीय किनार्‍यांचे रक्षण व्हावे, त्या माध्यमातून पर्यावरणातील सर्व घटकांचे जतन आणि संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

कांदळवनात भव्य अशी जीवसृष्टी दडलेली आहे. वन आणि वन्यजीवांचे, पर्यावरणातील प्रत्येक सूक्ष्म घटकांचे महत्व आणि त्याचे रुप आपण समजून घेणे गरजेचे आहे. ते समजून घेता येत नसले तरी ते जपण्याची आणि त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे. तिथे कुणीही कमी पडता कामा नये, असे आवाहन त ठाकरे यांनी याप्रसंगी केले. माझी वसुंधरा अभियानात सहभागी होऊन पारितोषिक मिळवलेल्या सर्व पुरस्कार्थींचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. तसेच या अभियानात सहभागी होऊन उत्तम काम करणार्‍या आणि सहभाग नोंदवणार्‍या गाव-शहरातील संस्थांचा, कार्यकर्त्यांचा आणि सर्व सहभागीदारांचा त्यांनी गौरव केला.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वन विभागाच्या कांदळवन कक्षाने तयार केलेल्या ‘बायोसेंटिनल्स ऑफ कोस्टल महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोड यांच्यासह विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, माझी वसुंधरा अभियानात सहभागी झालेल्या स्थानिक संस्थांचे पदाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि गाव आणि शहर पातळीवर अभियानात सहभागी होऊन काम करणारे कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -