वाचू आनंदे

Subscribe

दोन दिवसांपूर्वीच सर्वत्र वाचन प्रेरणा दिन साजरा झाला. वाचनाचे महत्व केवळ वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने सांगणे आणि त्या दिवशीच वाचनाविषयी ममत्व वाटणे हे कोणत्याही सुसंस्कृत, प्रगत समाजाचे खचितच लक्षण नाही. तरीही या निमित्ताने का होईना वाचनाचे महत्व पृष्ठस्तरावर येते, तसेच काही लोक यातून वाचनाकडेही वळतील ही भाबडी आशा बाळगून का होईना, या दिवसाचे औचित्य मानण्यास हरकत नाही. ज्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिन साजरा होत आहे, ते भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांचे पुस्तकांवरील प्रेम तर सर्वज्ञातच आहे. ज्ञानाची एवढी उंची प्राप्त करणारा हा माणूस ग्रंथावर निखळ प्रेम करणारा होता. त्यांच्यासारखा साधेपणा जोपासता आला नाही तरी चालेल; परंतु त्यांची ग्रंथजिज्ञासा आणि त्यांची ग्रंथसंग्रह वृत्ती जोपासली तरी वाचन प्रेरणा दिनाचं सार्थक होईल.

आजची पिढी वाचत नाही अशी एक सार्वत्रिक ओरड नेहमी केली जाते. वाचनावर प्रेम करणारी मंडळी तर ती करतातच; परंतु वाचनाच्या आसपास न फिरकणारीही यात सामील असतात हे विशेष. वाचनसंस्कृती टिकून राहणे, अथवा ती जोपासणे ही एक सामाजिक गरज आहे; परंतु आजच्या समाजाचे प्राधान्यक्रम पाहता ही निकड अगदी तळाशी आहे. हे वास्तव लक्षात घेता समाजजीवनात पुस्तकांचे महत्व कसे रुजणार? हा एक सांस्कृतिक प्रश्न आहे. असे प्रश्न आताच निर्माण झालेत असेही नाही. खानोलकरांनी सत्तरच्या दशकात हाच प्रश्न त्यांच्या ललित लेखातून खूप मार्मिकपणे मांडला होता. एक ग्रामीण माणूस मुंबईत येतो. इथे आल्यावर केवळ समुद्रच न पाहता जहांगीर कलादालन पहावे, जे जे स्कूल ऑफ आर्ट पहावे असे त्याला वाटते. तो बिचारा या स्थळांचा पत्ता अनेक महाराष्ट्रीय माणसांना विचारतो. परंतु त्याची हेटाळणी करून वरून त्याला ‘मुंबईत व्यवस्थित पत्ता असल्याशिवाय नेमक्या स्थळी पोहचता येत नाही’ मदतीऐवजी असे आगाऊ सल्ले त्याला मिळतात. अचानक त्याला एक गोरा माणूस दिसतो. तो अमेरिकन असतो. त्याला हा पत्ता विचारतो. आणि काय आश्चर्य तो माणूस म्हणतो, मी तिकडेच चाललो आहे, चला मी तुम्हाला तिथे सोडतो. भारतात आलो की, मी या स्थळांना भेटी देतोच. आपल्या सांस्कृतिक अनास्थेचे हे उदाहरण. आजही यात फारसा फरक पडला असे नाही.

वाचनसंस्कृती लोप पावते आहे हे एक अर्धसत्य आहे..आज वाचन संस्कृतीबद्दल जे निराशेचे, उदासीनतेचे सूर ऐकू येतात त्याला सांस्कृतिक व्यवहारातील अनेक घटक कारणीभूत आहेत. यावर उपाय म्हणून काही सकारात्मक प्रयत्न नक्कीच होत आहेत.

- Advertisement -

‘लोकराज्य’चा वाचन एक अमृतानुभव हा विशेष अंक यावर आधारित होता. ‘ग्रंथाली ‘ने तर वाचन चळवळीचे सामूहिक पातळीवर विविध उपक्रम राबवून सर्वप्रथम जनजागरण केले. 1982 मध्ये ग्रंथप्रसार यात्रा, 1983ला ग्रंथ एल्गार, 1986 मध्ये ग्रंथमोहोळ आणि 1987 या वर्षी बाल झुंबड हे सर्व कृतिशील उपक्रम त्याचे उत्तम उदाहरण आहे. साधारणतः इ.स. नव्वदच्या उंबरठ्यावरच विविध माध्यमांचे आव्हान आणि त्यातून ग्रंथ संस्कृतीवर होणार्‍या संक्रमणाची चाहूल लागलेली होती. आजही अनेक प्रकाशन संस्था वाचकांनी पुस्तकाकडे आकर्षित व्हावे म्हणून अनेकविध प्रयोग राबवत आहेत; परंतु ठराविक पातळीच्या पलीकडे त्याचा विस्तार होताना दिसत नाही. पुस्तकं ही जीवनावश्यक वस्तूंच्या जागी यायला हवीत अशी चर्चा आणि मागणी आज काही प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेते विविध माध्यमातून करताना दिसत आहेत. कारण या दोन वर्षात या व्यवसायाला सर्वाधिक फटका बसला आहे. परंतु सामाजिक पाठिंब्याशिवाय आणि जगण्याच्या किमान गरजा भागल्याशिवाय सर्वस्तरावर या अपेक्षांची पूर्ती होणे शक्य नाही. कारण वाचन ही आज केवळ व्यक्तिगत बाब झालेली आहे. ती सामाजिक गरज बनल्याशिवाय या अपेक्षा वास्तवात साकार होऊ शकणार नाहीत.

1970 च्या दशकात टेलिव्हिजनचा आपल्या सांस्कृतिक जीवनात प्रवेश झाला. आणि त्यानंतर या छोट्या पडद्याने आपले भावजीवन व्यापून टाकले. त्याआधीही चित्रपट माध्यमाने नाटक आणि लोकनाट्य यासारख्या जिवंत समूहजीवी कलांना झाकोळून टाकले होते. यात नाटक कसेतरी तग धरून उभे राहिले, परंतु मराठी मातीतील लोकनाट्य ही अस्सल कला मात्र पुन्हा तितक्या ताकदीने उभी राहू शकली नाही. नव्वद नंतरच्या माध्यम क्रांतीने हीच परिस्थिती ग्रंथ जगतात निर्माण केली. या माध्यम क्रांतीने अवघ्या विश्वालाच कवेत घेतले. माणूस माध्यम केंद्री बनला. जगाच्या कुठल्याही कोपर्‍यातील बातमी, माहिती आपल्यापर्यंत क्षणार्धात येऊन धडकू लागली. ‘करलो दुनिया मुठ्ठीमे’ अशा एका क्लिकवर सर्व काही उपलब्ध होऊ लागले. पुस्तक वाचल्याशिवाय काही बाबी अवगत होऊ लागल्या, पुस्तके हीच जेव्हा माहितीचे प्राथमिक स्रोत होते, तेव्हा त्यावर विसंबून राहणे गरजेचे होते. आता ही निकड सामान्य वाचकांना राहिली नाही. नवमाध्यमे या काळात अधिक विस्तारत ती अधिक समाजाभिमुख झाली. माध्यमांची ही गतिमानता आणि जागतिकीकरणाच्या रेट्याने माणूस माध्यम केंद्री बनला. यात माहिती आणि ज्ञान यांचे भान सुटत गेले. यात वाचन मागे पडत गेले. मागील दशकात हे वाचन वर्तमानपत्राच्या रविवार पुरवणी पुरतेच मर्यादित होते. आता तर ते समाजमाध्यमापुरतेच सीमित झालेय. माध्यमकेंद्री समाज या कोशातच गुरफटला गेला. मूळ संदर्भ न पाहता, कोणतीही खातरजमा न करता वरवरच्या महितीलाच हा समाज ज्ञान समजू लागला. यातून अभ्यासोनी प्रकटावे या वृत्तीचा र्‍हास होऊन प्रतिक्रियावाद वाढत गेला. या समाजवास्तवाची प्रचिती शिक्षणापासून ते राजकारणापर्यंत येताना दिसते. या समाज वास्तवाचा अत्यंत गंभीर परिणाम वाचन संस्कृतीवर झाला. असे असले तरी काही पुस्तकांच्या लाखो प्रती आज विकल्या जात आहेत.

- Advertisement -

‘हिंदू’ कादंबरीचे उदाहरण याबाबतीत महत्वाचे आहे.. ईबुक्स, कींडल, वेब पोर्टल यासारख्या नव्या माध्यमात, नव्या डिजिटल रुपात पुस्तके आपणास भेटत आहेत. यावरून एक गोष्ट सहज ध्यानात येते ती म्हणजे एक व्यक्तिगत छंद म्हणून वाचन ही बाब आज जोपासली जातेय. आणि पुढील काळातही वाचनाचे स्वरूप असेच रहाणार आहे. तसेच जे सकस आहे ते वाचले जाणारच आहे याचेही हे द्योतकच म्हणावे लागेल. नव्या तंत्रज्ञानामुळे पुस्तक प्रकाशित करणे सहज सोपे झालेय. त्यामुळे अनेक पुस्तके प्रकाशित होत आहेत. याला अनेक व्यावसायिक, व्यावहारिक कारणेही आहेत. ही संख्यात्मक वृध्दी दिसत असली तरी गुणात्मक वाढ समजण्यास मात्र संदेह आहे. वाचणारा जो सजग वाचक आहे, त्याला निवडण्याचे भान आहे त्यामुळे आजही सकस साहित्य वाचले जाते. परंतु हे चित्र अतिशय मर्यादित आहे. दर्जेदार साहित्य ते ललित असो अथवा वैचारिक, त्याची चर्चा व्हायला हवी. परंतु अशी चर्चा करणारा, उत्तमाची पारख करून दर्जेदार साहित्य वाचकाभिमुख करणार्‍या साक्षेपी समीक्षकांची दुर्मिळता हाही आजचा कळीचा प्रश्न आहे. अजूनही तरुण वाचक ग्रंथ जगताच्या परिघावरच आहे. ग्रंथालयाकडे वळणारी पाऊले कमी होत आहेत. समाज माध्यमांच्या मगर मिठीतून तरुणाईला पुस्तकाकडे वळवल्याशिवाय हे घडणे शक्य नाही. यासाठी व्यापक अशी लोक चळवळ उभारणे गरजेचे आहे. तरुणांचे भावविश्व, त्यांचे जगणे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या आशा-आकांक्षा यापासून आजचे साहित्य कोसो मैल दूर आहे. याला काही सन्माननीय अपवाद असतीलही, परंतु ते खूप कमीच. अल्केमिस्ट ही कादंबरी तरुण वर्गामध्ये खूप वाचली गेली असे मानले जाते. ते खरेही आहे. अलीकडेच केरळातील एका रिक्षावाल्याने तर या कादंबरीचे आणि त्या लेखकाचे चित्र आपल्या रिक्षांवर मिरवले. आणि ही बातमी जागतिक झाली. त्या आंतरराष्ट्रीय लेखकाने याची दखल घेऊन याचे ट्विट केले. आपल्या भाषेतील लेखनात असे सामर्थ्य असूनही तरूणांपर्यंत ते जात नाही हे वास्तव खेदजनक आहे. तरुणांना, त्यांच्या वयानुसार आणि त्यांच्या समजानुसार लिहिले जाणारे साहित्य आवडण्यात काहीच गैर नाही.

शिस्तबद्ध, वैचारिक, सकस वाचनाची सवय उत्तरोत्तरच आणि वाचनाच्या सातत्यातूनच प्रगल्भ होत जात असते. परंतु तरुणाचे भावविश्व चित्रित करणार्‍या साहित्याला रंजनवादी म्हणून साहित्यातून बाद केले जाते. त्यामुळे ज्यात आपले जगणेच नाही, त्याकडे ही माध्यमांनी भारलेली पिढी कशी वळेल? म्हणूनच त्यांची मानसिक, सांस्कृतिक भूक आज ओटीटीसारखी तत्सम माध्यमे भागवत आहेत. गुगल गुरू त्यांच्या उशाला आहे. या वास्तवाकडे डोळेझाक करून चालणार नाही. माणसांचे जीवन हे बहुस्तरीय आहे. त्यामुळे साहित्यातून अभिव्यक्त होणार्‍या विविधांगी अनुभवांची, विविध वैचारिक व्युहांचे, प्रवाहांचे, स्वागत करण्याची स्वीकारशीलता आपल्यात पाहिजे. मधल्या काळात वेतनेतर शासकीय अनुदान देणे बंद झाल्याने त्याचा परिणाम ग्रंथविश्वावर होणे स्वाभाविक आहे. ही सांस्कृतिक अनास्था, निश्चितच चिंताजनक आहे. कागद, छपाई आणि त्यावर लावला जाणारा कर यामुळे पुस्तकांच्या किमती वाढलेल्या आहेत. सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात ही बाब यायला हवी. या दशकात केवळ प्रकाशन व्यवसायच नाही तर दैनिक वृत्तपत्रे प्रकाशित करणेही जिकिरीचे झाले आहे. सर्व प्रकारच्या शासकीय करातून ही माध्यमे वगळल्याशिवाय सांस्कृतिक उन्नती होणे शक्य नाही. साहित्य, संस्कृती, कला हे घटक आपल्या आस्थेच्या केंद्रस्थानी नाहीत याचेच हे प्रत्यंतर आहे. सब घोडे बारा टक्के या न्यायाने सांस्कृतिक व्यवहाराकडे पाहण्याची दृष्टी बदलल्याशिवाय या क्षेत्राला चालना मिळणार नाही. कारण किती माध्यमे आली तरी पुस्तकांची जागा ही माध्यमे घेऊ शकणार नाहीत, कारण आपले व्यक्तिगत छंद आणि अभ्यास म्हणून पुस्तके हीच सर्वश्रेष्ठ आणि सशक्त माध्यम आहे आणि ते राहीलच यात कोणताही संदेह नाही!

डॉ.अशोक लिंबेकर

(लेखक संगमनेर महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -