आयपीएलच्या यंदाच्या हंगामात विराट कोहली आणि रोहित शर्मा भारताच्या प्रमुख खेळाडूंना अद्याप नावाला साजेशी अशी खेळी करता आलेली नाही. या हंगामात दोघांनी आतापर्यंत एकही मोठी खेळी खेळलेली नाही. पण ते लवकरच फॉर्ममध्ये परततील अशी आशा चाहत्यांना आहे. या हंगामात कोहली आणि रोहितचा खराब फॉर्म खूप चर्चेत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांनी या दोन स्टार खेळाडूंच्या खराब फॉर्मवर आपले मत मांडले आहे.
हे दोन्ही प्रमुख फलंदाज लवकरच फॉर्ममध्ये परततील, अशी आशा गांगुलीने व्यक्त केली. सौरभ म्हणाला, “ते दोघेही महान खेळाडू आहेत आणि मला खात्री आहे की ते लवकरच फॉर्ममध्ये येतील. मला आशा आहे की ते लवकरच धावा करण्यास सुरुवात करतील. मला माहित नाही की विराट कोहली काय विचार करत आहे पण मला खात्री आहे की तो लवकरच त्याचा फॉर्ममध्ये येईल आणि चांगल्या धावा करेल. तो एक उत्तम खेळाडू आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने नऊ सामन्यांत केवळ 128 धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी १६ आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची बॅटही शांत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहितने आठ सामन्यांत १९.१३ च्या सरासरीने १५३ धावा केल्या आहेत. या हंगामात दोन्ही खेळाडूंना अर्धशतकही झळकावता आलेले नाही.
दरम्यान, गांगुली म्हणाला की तो आयपीएल २०२२ खूप जवळून पाहत आहे. यासह, दोन नवीन फ्रँचायझींनी ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे त्यावरून तो खूपच प्रभावित झाला आहे.