अलिबाग: साळाव-रेवदंडा पुलाखालून मालवाहतूक बार्जची दिवसरात्र नेहमीच ये-जा सुरू असून त्यामुळे पुलास धक्के बसत असल्याचे अनेक ग्रामस्थांचे मत आहे. बार्जच्या वारंवार होत असलेल्या घर्षणाने आणि धडकेने साळाव पुल खिळखिळा होत आहे. साळाव पुलास धोका निश्चित असल्याचे प्रवासी आणि ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
रेवदंडा-साळाव पुल हा विशिष्ट पध्दतीने बांधकाम केलेले आहे. साळाव पुलास काही अंतरावर पिल्लर बसविण्यात आले असून या दोन पिल्लरमधील अंतर खूपच लहान आहे तसेच समुद्र पातळीपासून फारच साळाव पुलाची उंची सुध्दा कमी आहे. या पुलाचे खालून मालवाहतूक बार्जना जा-ये करताना अगदीच छोटा मार्ग मिळतो, या कमी उंची आणि छोटा मार्ग यामुळे येथून ये-जा करत असलेल्या मालवाहतूक बार्ज जेमतेम पास होत असतात, जर बार्ज ने-आण करताना, जरा इकडे तिकडे झाल्यास बार्ज पुलाचे पिल्लरला घर्षण करते अथवा धडकते आणि पूल हलतो, असे अनेकदा येथून पुलावरून प्रवास करत असलेल्या प्रवासीवर्गाला तसेच स्थानिक रहिवाश्याच्या नजरेत आले आहे.
पुलास संरक्षण द्यावेे
साळाव पुलाचे खालून रात्रीचे वेळीस सुध्दा कोळसा वाहतूक होत असते आणि इंडो एनर्जी प्रा.लि. कंपनी हा कोळसा सानेगाव जेटीवर उतरवून घेते. मात्र कोळसा वाहतूक करणारा बार्ज काळोख्या रात्रीचे वेळेस पुलाचे खालून जाताना, बिमला घर्षण करतात तसेच धडकत असल्याची बाब अनेक स्थानिकांचे तसेच प्रवासीवर्गाचे निदर्शनास आले आहे. संबधीत खात्याने इंडो एनर्जी प्रा.लि कंपनीची साळाव पुलाचे खालून मालवाहतूक बार्जव्दारे होत असलेली कोळसा वाहतुक त्वरीत बंद करावी आणि साळाव पुलास संरक्षण द्यावेे , अशी मागणी प्रवासी र् तसेच स्थानिक जनता करत आहेत.
बार्जमधून कोळसा वाहतूक
साळाव-रेवदंडा पुलाखालून ये-जा करत असलेल्या मालवाहतूक बार्जच्या संदर्भात रेवदंडा बंदर निरिक्षक सतिश देशमुख यांचेशी संपर्क केला असता, या मालवाहतूक बार्ज मधून कोळसाची वाहतूक होत असून हा कोळसा इंडो एनर्जी प्रा.लि. ही कंपनी सानेगाव येथील जेटीवर उतरवून घेते. सदर वाहतुक मेरी टाईम बोर्डाच्या शासकीय परवानगीने होत असल्याचे सांगितले. साळाव-रेवदंडा पुलाखालून जा-ये करत असलेल्या कोळसा वाहतुक करणार्या मालवाहतूक बार्जचे नित्याने साळाव पुलास घर्षण होत असल्याचे सांगितले, मात्र रेवदंडा बंदर निरिक्षक देशमुख यांनी येथे नुकतेच रूजू झालो असून याबाबत अधिक माहिती नसल्याचे सांगितले.