मुंबईः जल अभियंता खात्याने भांडूप संकुलाशी संबंधित जलवाहिनी दुरुस्ती व बदलीची कामे हाती घेतल्याने सोमवारी सकाळपासून फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते विशेषतः महिलांचे पाण्यासाठी कमी – अधिक प्रमाणात हाल झाले. ज्यांना पाणीबाणीची माहिती नव्हती त्यांना नजीकच्या इमारती, सोसायट्यांमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागली. अनेकांनी बाटलीबंद पाण्याची खरेदी करून आपली तहान भागवली.
मुंबई महापालिका जल अभियंता खात्यामार्फत ३० जानेवारी रोजी भांडूप संकुलशी संबंधित जलवाहिनी बदलणे, गळती दुरुस्तीची मोठी कामे हाती घेण्यात आली. त्यामुळे मुंबईतील १२ विभागात ३० जानेवारी रोजी सकाळी १० पासून ते ३१ जानेवारी रोजी सकाळी १० पर्यंत म्हणजे २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला.
‘ जी/उत्तर’ आणि ‘जी/दक्षिण’ या २ विभागातील माहीम (पश्चिम), दादर (पश्चिम), प्रभादेवी व माटुंगा (पश्चिम) या परिसरातील पाणीपुरवठ्यात ३० व ३१ जानेवारी रोजी २५ टक्के कपात करण्यात आली. तर धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ या दरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात ३० जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. याबाबतची माहिती जल अभियंता खात्याने मुंबईकरांना अगोदरच देऊन पाणीसाठा करून त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.
मात्र काही नागरिकांना पाणीबाणीबाबत पुरेशी माहिती नव्हती. विशेषतः झोपडपट्टी परिसरातील काही नागरिकांना सोमवारी सकाळपासून ते मंगळवारी सकाळपर्यंत म्हणजे २४ तास पाणी बंद असणार याची माहिती नसल्याने त्यांना नाईलाजाने नजीकच्या इमारती, सोसायटीमध्ये अगोदरच साठवून ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून २ – ४ हांडे पाणी पिण्यापुरता मागून घेऊन स्वतःसह कुटुंबियांची तहान भागवावी लागली.
पाणीबाणीतही गाड्या धुण्याचे काम जोरात
आज मुंबईतील १२ महत्वाच्या विभागात पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता. काही लोकांचे त्यामुळे पाण्यासाठी हाल झाले. मात्र घाटकोपर येथे अंधेरी -घाटकोपर लिंक रोडवर दुचाकी, चारचाकी गाड्या धुण्याचे काम जोरात चालू असल्याचे निदर्शनास आले. त्याने कदाचित अगोदरच पाण्याच्या टाकीत पाणी साठवून ठेवले असावे. मात्र एकीकडे नागरिकांना पाणीबाणी लागू असल्याने पाण्याचा जपून वापर करावा लागत असताना दुसरीकडे मात्र गाड्या धुण्यासाठी पाण्याची उधलपट्टी सुरू होती.
जलवाहिनी दुरुस्ती, बदलीचे काम युद्धपातळीवर
मुंबई महापालिकेने भांडूप जलवहिनीशी संबंधित जलवाहिनी दुरुस्ती, बदलीचे हाती घेतलेले काम युद्धपातळीवर सुरू आहे. १०० – १२५ अधिकारी व कर्मचारी सदर काम जोमात करीत आहेत. हे काम नियोजित वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रमुख जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली.