घरफिचर्सज्यांनी बाहेर काढले तेच सिंकदर

ज्यांनी बाहेर काढले तेच सिंकदर

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे मतदान संपले आहे. देशात अजून तीन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. त्यामुळे त्याची रणधुमाळी अजून एकोणीस दिवस सुरूच रहाणार आहे. निवडणूकीच्या लढाईत प्रचाराला कितीही दिवस असोत. त्यातला निर्णायक दिवस मतदानाचा असतो. कारण त्याच दिवशी खरीखुरी तुंबळ हाणामारी होत असते. ज्यांचे उंबरठे झिजवले, त्यांनी त्याच दिवशी ठरल्या वेळेत मतदान केंद्रात जाऊन मत देणे आवश्यक असते. असे जे मतदार तिथे जाऊन आपले मत नोंदवतात, त्यांचाच प्रभाव निवडणूक निकालावर पडत असतो. अन्यथा किती नोंदलेले मतदार आहेत आणि कितीजण कुठल्या पक्ष उमेदवाराचे समर्थक असतात, त्याने काडीमात्र फरक पडत नाही. जी मते नोंदवलेली म्हणजे यंत्रात बंदिस्त होतात, त्यांच्याच मोजणीवर शेवटी निकाल लागणार असतो. म्हणूनच लोकशाहीच्या आखाड्यात मतदानाचा दिवस व पराक्रम खरा निकाली सामना असतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा व नरेंद्र मोदी यांनी तिथेच मोठी बाजी मारली होती. त्यानंतरही अनेकदा मोदींनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्याचाच उल्लेख केलेला होता. मतदान केंद्रात आपल्या पाठीराख्यांना घेऊन येईल, तोच खरा निवडणुकीतला लढवय्या असतो. त्याला कार्यकर्ता म्हणतात. त्याच्याकडून जितके मतदान घडवले जाते, त्यावर निकाल अवलंबून असतो. कारण जितके आपले पाठीराखे अनुयायी अधिक मतदान करतील, तितका मतातील आपला हिस्सा वाढत असतो. त्यामुळेच त्या त्या मतदारसंघात आपला वा पक्षाचा उमेदवार जिंकू शकत असतो.

प्रचारातून विविध पक्ष व उमेदवार आपल्या पाठीराख्यांना आवाहन करत असतात. पण तेवढ्यावर सामान्य नागरिक बाहेर पडून मतदान करीलच, याची सहसा हमी नसते. साधारणपणे निम्मे मतदार स्वेच्छेने मतदानाला जात असतात. त्यात मग सर्वच पक्षांचे पाठीराखे सहभागी असतात. म्हणुन अशा मतांची नैसर्गिक विभागणी होत असते. त्यात ज्याचे पारडे जड असते, त्याला सहज विजय मिळू शकतो. पण इथे जो उमेदवार आपल्याला मिळावे म्हणून खूप प्रयत्नशील असतो, त्याच्यामुळे मतदानात वाढ होते. उदासिन रहाणारा वा कंटाळा म्हणून घरीच बसणारा आपल्या परिचयातला मतदार कार्यकर्ता बाहेर काढू शकला, तर मतदानात मोठी घसघशीत वाढ होते. अशा प्रकारे वाढवलेले सर्वच मतदान आपल्याच पारड्यात पडायची शक्यता असतेच असेही नाही. पण जो मतदार कुणाच्या आग्रहाला बळी पडून मत द्यायला घराबाहेर पडतो, तो सहसा त्याच उमेदवाराला मत देण्याची शक्यता अधिक असते. साधारणत: दहापैकी सात आठ मतदार याप्रकारे कार्यकर्त्याच्या आग्रहाने बाहेर पडल्याने, त्याच पक्षाच्या झोळीत आपले मत टाकतात. कारण कार्यकर्तेही अशाच लोकांच्या गळी पडू शकत असतात.

- Advertisement -

२०१४ सालच्या लोकसभा निवडणूकीत आजवरच्या इतिहासातले विक्रमी मतदान झालेले होते. ते व्हावे यासाठी भाजपाने योग्य रणनिती आखलेली व राबवलेली होती. त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्र हे युद्धक्षेत्र असल्याप्रमाणे व्युहरचना केलेली होती. परिणाम म्हणून अंदाजे देशभरात चौदा कोटी मतदान संख्येने वाढले, त्यासाठी भाजपाने खुपच प्रयास केलेला असल्याने त्याच्या मतांमध्ये भरघोस म्हणजे साडे नऊ कोटी मतांची वाढ झाली. जवळपास २००९च्या तुलनेत भाजपाची मते दुप्पट झाली. तितके प्रयास काँग्रेस वा अन्य पक्षांकडून झाले नाहीत. सहाजिकच त्याचा योग्य लाभ भाजपाला मिळू शकला. अपेक्षेपेक्षा प्रचंड मतांनी भाजपाचे उमेदवार निवडून आलेच. पण जिथे म्हणून मतदान वाढले, तिथे भाजपाला यश सहजगत्या मिळवता आले. याची उलट बाजू अशी, की तीनच महिन्यांनी उत्तर प्रदेश, बिहार वा गुजरातमध्ये रिकाम्या जागी पोट निवडणूका झाल्या. या बहुतेक जागा भाजपाच्याच हक्काच्या होत्या. पण तिथे मोठ्या प्रमाणात भाजपाचा दारूण पराभव झाला. यातल्या बहुतेक जागा विधानसभा निवडणुकीत भाजपाने जिंकलेल्या होत्या. पण तेच आमदार लोकसभेत पुन्हा निवडून गेल्याने रिकाम्या जागी पोटनिवडणुका झालेल्या होत्या. मग तीन महिन्यात तिथली मोदींची जादू वा लाट संपलेली होती काय? तसे अजिबात नव्हते. लोकसभेसाठी जे रान उठवण्यात आलेले होते आणि मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांनी जितकी मेहनत घेतली होती, तितका प्रयास पोटनिवडणूकीच्या वेळी झाला नाही. मतदान खूपच रोडावले आणि त्याचेच प्रतिबिंब निकालावर पडले.

हक्काच्या जागा भाजपाच्या उमेदवारांना गमावण्याची नामुष्की आली. त्याचे प्रमुख कारण जबाबदारी म्हणून मतदान करणारा सर्वत्र समान विभागला जातो आणि अगत्याने घराबाहेर काढून केंद्रात नेलेला मतदार आपल्याला साथ देत असतो. त्याचा विसर पडलेल्या भाजपाला फटका बसला. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हे पक्ष एकच गोत्रातले आहेत आणि शतायुषी पुर्वेतिहास त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे गांधी-नेहरूंची पुण्याई त्यांच्या पदरात ठराविक मते घालत असते. तितकी पुण्याई अजून भाजपा, शिवसेनेकडे नाही. त्यांचाही एक ठराविक मतदार आहे. पण तो बहुतांश मतदारसंघात निर्णायक नाही. या पक्षांना आपला चहाता केंद्रात आणावा लागतो. त्यासाठी जितकी मेहनत बिगर काँग्रेस पक्ष घेतात, तितका त्यांचा लाभ होत असतो. तामिळनाडू, बंगाल, बिहार यासारख्या राज्यात काँग्रेसची पुण्याई संपुष्टात आलेली असल्याने त्यांचा मतांचा टक्का घसरलेला आहे आणि चहात्याला घराबाहेर काढणार्‍या कार्यकर्त्याची फौज त्यांच्यापाशी राहिलेली नाही. म्हणूनच तिथे अजून काँग्रेसला मतांचा नगण्य हिस्सा प्रयत्नाशिवाय मिळतो. पण विजयापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. नुसत्या प्रचारावर विसंबून भागत नाही. मतदान जितके वाढवता येईल, तितकी त्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता वाढणार आहे. आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यांच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का एक, दोनने का होईना पण वाढला आहे. यावेळीही राज्यात प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी सेना-भाजपचेच कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना, मतदानासाठी बाहेर काढत असल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम निश्चित निवडणुकांच्या निकालांवर पडलेला दिसून येणार आहे.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -