UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा आज सहावा टप्पा पार पडला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उत्तर प्रदेशात ५३.३१ टक्के मतदान झाले. आंबेडकनगरमध्ये सर्वाधिक ५८.५० टक्के मतदान झाले तर बलरामपूर येथे सर्वात कमी ४८.५३ टक्के मतदान पार पडले. उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणूकांच्या रणधुमाळीत सहाव्या टप्प्यात सर्वात कमी मतदानाची नोंद करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी अजय कुमार शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश विधानसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. संध्याकाळ ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५३.३१ टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेश निवडणूकीत सात टप्प्यातील एकूण ४०३ पैकी ३४९ जागांवर सहा टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकांचा शेवटचा सातवा टप्पा येत्या ७ मार्च रोजी होणार असून १० मार्च निवडणूकांचे निकाल जाहीर होणार आहेत.
उत्तर प्रदेशच्या सहाव्या टप्प्यातील मतदानात एकूण १० जिल्ह्यांत मतदान झाले. ज्यात आंबेडकर नगरमधील ५, बलरामपूरमधील ४, सिद्धार्थ नगर मधील ४, बस्ती मधील ५, संतकबीर नगर मधील ३, महाराजगंज नगरमधील ५, गोरखपूरमधील ९, कुशीनगर मधील ७, देवरिया आणि बालियामधील ७ विधानसभा जागांचा समावेश होता. सहाव्या टप्प्यात ६७६ उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात होते.
उत्तर प्रदेश निवडणूकांच्या सहाव्या टप्प्यातील मतदान फार महत्त्वाचे समजले जात आहे कारण सहाव्या टप्पात गोरखपूर मतदार संघातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूकीच्या रिंगणात उभे राहिले होते. योगी आदित्यनाथ यांच्यासह प्रसाद मौर्य, लालजी वर्मा,रामचल राजभर,जय प्रताप सिंग, यूपीचे मूलभूत शिक्षण मंत्री सतीश चंद्र द्विवेदी,प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय, कुमार लल्लू,योगी कॅबिनेट मंत्री सूर्य प्रताप शाही,यूपीचे राज्यमंत्री श्रीराम चौहान आणि राज्यमंत्री जयप्रकाश निषाद यांचे उमेदवारी पणाली लागली आहे.
हेही वाचा – UP Election 2022 : सायकलचा अपमान हा देशाचा अपमान, अखिलेश यादव मोदींवर कडाडले