कोरोनामुळे आधीच मुंबई स्लो झालेली असताना सोमवारी सकाळी मुंबईच्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे मुंबई ठप्पच झाली. याचा फटका उपनगरीय रेल्वे सेवेला बसला असून अनेक स्थानकादरम्यान रेल्वे रुळावरच थांबल्या आहेत. त्यामुळे प्रवाशी ट्रेनमधून उतरून पायी चालत स्टेशन गाठताना दिसले. डोंगरी, भायखळा ,लालबाग, परळ, सह अनेक भागातील वीज पुरवठा सकाळी १०.१५ च्या सुमारास खंडित झाला. वीज पुरवठा खंडित झाल्याने सीएसटी स्थानकातील फलाट क्रमांक ६ वर फास्ट लोकल अचानकपणे बंद पडली. यामुळे ठीकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे.
विविध रेल्वेस्थानकांवर लोकल गाड्या एकापाठोपाठ एक अशा आहेत. आज सोमवार असल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचा आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची लोकल ट्रेनमध्ये गर्दी करीत असतात. फास्ट ट्रेन पकडण्यावर त्यांचा अधिक भर असतो त्यामुळे लोकलमध्ये आधीच कामावर जाण्यासाठी गाडी पकडून कसेबसे सीएसटी स्थानकात पोहोचले. तर याच ठिकाणी लोकल बंद पडल्याने बहुतेक प्रवाशांना लोकलमधून उड्या मारून बाहेर पडावे लागले. आधीच लॉक डाऊन त्यात कार्यालयात वेळेवर पोहोचणे गरजेचे आहे. परंतु मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये तसेच नखरे सुरू राहिले तर लोकांनी कामावर कधी जायचे? अशा प्रकारचा मध्य रेल्वेवर राग प्रवासी व्यक्त करीत होते. दरम्यान गेल्या अर्ध्या तासापासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे, पुन्हा केव्हा सुरू होईल याची वाट प्रवासी पाहत आहेत.
“देखभाल दुरुस्तीचे काम सुरु असताना कळवा-पडघा येथील वीज उपकेंद्रात थोडा बिघाड झाला. त्यामुळे मुंबईतील वीज सेवा खंडीत झाली. मात्र विद्युत विभागातील कर्मचारी युद्ध स्तरावर काम करत असून काही तासातच वीज पुरवठा सुरळीत होईल”, अशी प्रतिक्रिया ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली.
"देखभाल दुरुस्तीचे काम सुरु असताना कळवा-पडघा येथील वीज उपकेंद्रात थोडा बिघाड झाला. त्यामुळे मुंबईतील वीज सेवा खंडीत झाली. मात्र विद्युत विभागातील कर्मचारी युद्ध स्तरावर काम करत असून काही तासातच वीज पुरवठा सुरळीत होईल" – ऊर्जा मंत्री @NitinRaut_INC pic.twitter.com/VEsM4dyuco
— My Mahanagar (@mymahanagar) October 12, 2020